युक्रेनमध्ये अडकलेल्या पाकिस्तानी तरुणीने दाखवला भारतीय तरुणावर विश्वास, गोळीबारात असे वाचले प्राण
युद्धाच्या परिस्थितीत ही भारतीय तरुणाने पाकिस्तानी तरुणीचे प्राण वाचवले. इतकेच नाही तर तिच्या कुटुंबियांना फोनवर तिच्या सुरक्षेची जबाबदारी ही घेतली.
Updated: Mar 04, 2022, 05:21 PM IST
मुंबई : युक्रेन आणि रशिया या दोन शेजारी देशांच्या सुरु असलेल्या युद्धात अनेक वेगवेगळ्या घटना समोर आल्या. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या अनेक वेदनादायी कहाण्या ही समोर आल्या. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान या जगातील आणखी दोन शेजारी देशांचा एक किस्सा चर्चेचा विषय बनला आहे.
हरियाणातील हिस्सारमधील आझाद नगरमध्ये राहणाऱ्या अंकितने मैत्रीचा नवा आदर्श घालून दिलाय. जोरदार गोळीबार आणि बॉम्ब हल्ल्यांच्या दरम्यान अंकितने मारिया या पाकिस्तानी विद्यार्थिनीला सुरक्षित स्थळी नेले. मात्र, दोन्ही विद्यार्थी अद्यापही आपापल्या मायदेशी परतण्यासाठी उत्सुक आहेत.
दैनिक भास्करशी संवाद साधताना हरियाणातील अंकितने सांगितले की, तो कीव पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये युक्रेनियन भाषेचा विद्यार्थी आहे. 25 फेब्रुवारी रोजी दुपारी 2.30 वाजता संस्थेपासून काही अंतरावर स्फोट झाला, त्यानंतर सुमारे 80 विद्यार्थ्यांना बंकरमध्ये नेण्यात आले. त्याने सांगितले की या गटात तो एकमेव भारतीय विद्यार्थी होता आणि पाकिस्तानची मारिया देखील या गटात होती. स्वतः अडचणीत सापडलेल्या अंकितने घाबरलेल्या मारियाच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि तिच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली.
अंकितने सांगितले की, जेव्हा तो सतत होत असलेल्या स्फोट आणि गोळीबारामुळे निघण्य़ाचा विचार करु लागला, तेव्हा मारियानेही सोबत येण्याबद्दल विचारले. त्याने सांगितले की ते दोघे 28 फेब्रुवारी रोजी कीवमधील बुग्जाला रेल्वे स्टेशनकडे निघाले. दोन्ही विद्यार्थी पायी प्रवास करत होते आणि अंकितने दोन दिवस जेवले नसल्याचे सांगितले. यादरम्यान, मारियाची प्रकृती अधिक गंभीर दिसत होती, हे पाहून अंकितने मारियाचे सामान उचलले आणि गोळीबाराच्या दरम्यान 5 किमी अंतरावर असलेल्या स्टेशनवर पोहोचला.
वृत्तपत्राशी केलेल्या संभाषणात त्यांनी स्थानकावरील परिस्थितीचे वर्णन केले की तेथे खूप गर्दी होती आणि त्यांच्या 3 गाड्या चुकल्या होत्या. यानंतर सायंकाळी 6 वाजता दोन्ही विद्यार्थी कसेबसे ट्रेनमध्ये चढले. अंकितने सांगितले की, तासाभरानंतर ट्रॅकच्या बाजूला स्फोट झाला आणि गोळीबार सुरू झाला. एवढेच नाही तर खिडकीतून एक गोळी येऊन डोक्यासमोरून गेल्याचे त्याने सांगितले.
अखेर दोन्ही विद्यार्थी 1 मार्चपर्यंत तेर्नोपिल स्टेशनवर पोहोचण्यात यशस्वी झाले. भारतीय विद्यार्थ्याने सांगितले की, येथे मारियाने पाकिस्तानी दूतावासाशी संपर्के केला आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने दोघांना वैद्यकीय विद्यापीठाच्या वसतिगृहात ठेवण्यात आले. यावेळी त्यांना कॉफी, ब्रेड आणि सूप देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पाकिस्तानी अधिकाऱ्याने केले अंकितचे कौतुक
रिपोर्टनुसार, या संपूर्ण घटनेवर पाकिस्तान दूतावासाने अंकितचे कौतुक केले. एका भारतीय मुलाने आमच्या मुलीला वाचवले असे दूतावासाने लिहिले आहे. दोन्ही देशांतील जनतेने एकमेकांचे पाय खेचण्याची ही वेळ नसून प्रेम आणि पाठिंबा देण्याची ही वेळ असल्याचेही ते म्हणाले.
अंकितने सांगितले की तो रोमानिया सीमेवर आहे आणि कॅम्पमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे. तेथे तापमान उणे असून त्यांना खूप ताप आणि अंग दुखत असल्याची माहिती त्यांनी दिली. तो म्हणाला की पाकिस्तानी दूतावासाने त्याला टेर्नोपिल येथून बसने रोमानिया सीमेवर पाठवले, परंतु बसने त्याला 15-20 किमी आधी खाली सोडले. येथून त्याने पायी सीमेपर्यंतचा रस्ता गाठला.
युद्धाच्या परिस्थितीत ही भारतीय तरुणाने पाकिस्तानी तरुणीचे प्राण वाचवले. इतकेच नाही तर तिच्या कुटुंबियांना फोनवर तिच्या सुरक्षेची जबाबदारी ही घेतली.
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.