Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2022: यंदा आयपीएलमध्ये कोणते बदल? स्पर्धेचे नवीन नियम काय? जाणून घ्या 10 मुद्दे

आयपीएलमध्ये प्रेक्षकांना परवानगी मिळणार का? बायोबबलचे नियम काय आहेत? होम आणि अवे सामन्यांचं काय? जाणून घ्या सर्व काही

IPL 2022: यंदा आयपीएलमध्ये कोणते बदल? स्पर्धेचे नवीन नियम काय? जाणून घ्या 10 मुद्दे

IPL 2022 : आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचं बिगूल वाजलं आहे. स्पर्धा सुरु व्हायरला अवघे 2 दिवस बाकी असून क्रिकेट चाहत्यांमध्ये जबरदस्त उत्साह पाहिला मिळतोय. यंदा आयपीएलचा संपूर्ण हंगाम महाराष्ट्रात खेळवला जाणार आहे. एकूण 70 सामने खेळले जाणार असून मुंबईतल्या तीन आणि पुण्यातल्या एका स्टेडिअमवर हे सामने रंगतील.

कोरोनामुळे आयपीएल 2020 स्पर्धा UAE मध्ये खेळवण्यात आली. त्यानंतर 2021 (IPL 2021) चा हंगाम भारतात सुरु झाला पण संपला यूएईमध्ये. कोरोनामुळे आयपीएलचा दुसरा टप्पा यूएईमध्ये खेळवण्यात आला. पण यावेळी बीसीसीआयने (BCCI) खबरदारी म्हणून सर्व सामने एकाच राज्यात खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या हंगामात आयपीएलमध्ये (IPL 2022) मोठे बदल पाहिला मिळणार आहेत. 

1. आयपीएल कधी आणि कुठे सुरु होणार?
आयपीएलच्या पंधराव्या हंगामाची सुरुवात होईल गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) लढतीने. पहिला सामना 26 मार्च रोजी मुंबईतील (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळवला जाणार आहे. संध्याकाळी 7 वाजता टॉस होईल आणि त्यानंतर संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होईल. या हंगामात एका दिवसात दोन सामने 12 वेळा खेळवले जाणार आहेत. पहिला सामना दुपारी 3.30 वाजता आणि दुसरा सामना 7:30 वाजता खेळवला जाईल.

2. 10 संघांच्या समावेशानंतर आयपीएलचं स्वरूप काय?
IPL 2022 मध्ये 10 संघांचा समावेश आहे. लखनौ सुपर जायंट्स (lucknow supergiants) आणि गुजरात टायटन्स (gujarat titans) पहिल्यांदाच सहभागी होण्यासाठी सज्ज आहेत. साखळी फेरीसाठी 10 संघांची 5-5 च्या दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. आयपीएलचे दोन सर्वात यशस्वी संघ, मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) वेगवेगळ्या गटात आहेत. सर्व संघ 14 सामने खेळणार असून साखळी फेरीत एकूण 70 सामने होणार आहेत. एका गटातील सर्व संघ एकमेकांविरुद्ध दोन सामने खेळतील. यानंतर दुसऱ्या गटातील एका संघाविरुद्ध दोन सामने आणि चार संघाविरुद्ध एक सामना खेळावा लागणार आहे.

उदा. चेन्नई सुपर किंग्जचा संघ त्यांच्या गटातील चार संघांविरुद्ध दोन सामने खेळणार आहे. याशिवाय अ गटातील मुंबई इंडियन्सविरुद्ध दोन सामने आणि इतर चार संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळेल. अशाप्रकारे चेन्नईचा संघाचे एकूण 14 साखळी सामने होतील.

3. लीग सामने कुठे खेळवले जातील?
कोरोनाचा धोका लक्षात घेता, यावेळी साखळीतले सर्व सामने दोन शहरांच्या चार स्टेडिअमवर खेळवले जातील. मुंबईतील वानखेडे, डीवाय पाटील आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर सामने होणार आहेत. तर पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सामने होणार आहेत. त्यामुळे खेळाडूंना विमानतळावर जाण्याची गरज भासणार नाही. खेळाडू स्टेडियम दरम्यान बसने प्रवास करू शकतील

4. यावेळी होम आणि अवे सामने होणार का?
वानखेडे आणि डीवाय पाटील इथं प्रत्येकी चार सामने तर ब्रेबॉर्न आणि एमसीए स्टेडियमवर प्रत्येकी तीन सामने खेळवले जाणार आहेत. त्यामुळे होम आणि अवे पद्धत यावेळी नसणार. मुंबईचा संघ 2019 नंतर पहिल्यांदाच वानखेडे स्टेडियमवर खेळणार आहे.

5. किती दिवस रंगणार स्पर्धा
साखळी फेरीत एकूण 70 सामने खेळवले जातील. हे सामने 26 मार्च ते 22 मे या कालावधीत 58 दिवस चालतील. यानंतर चार प्लेऑफ (Play Off) सामने होतील. अंतिम सामना 29 मे रोजी होणार आहे. प्लेऑफचं वेळापत्रक अद्याप जाहीर झालेलं नाही.

6. खेळाडू कोरोनाबाधित झाला तर?
स्पर्धेदरम्यान, एखादा खेळाडू किंवा सदस्य कोरोना बाधित आढळल्यास त्याला सात दिवसांसाठी आयसोलेट केलं जाईल. या दरम्यान सहाव्या आणि सातव्या दिवशी त्याची कोविड चाचणी केली जाईल. संघाच्या बायो-बबलमध्ये सामील होण्यासाठी, त्याच्या 24 तासांच्या कालावधीत सलग दोन आरटी-पीसीआर चाचण्यांमध्ये निगेटीव्ह असाव्या लागतील.

7. कोरोनामुळे खेळाडू उपलब्ध नसल्यास काय?
12 सदस्य उपलब्ध असल्यास फ्रेंचायझीला आहे त्या 11 खेळाडूंसोबत खेळण्यास सांगितले जाईल. यामध्ये सात भारतीय खेळाडू आणि एक बदली खेळाडू असेल. एखाद्या संघाकडे किमान 12 खेळाडू उपलब्ध नसतील तर BCCI दुसऱ्या दिवशी तो सामना आयोजित करेल. तसं न झाल्यास हे प्रकरण तांत्रिक समितीकडे पाठवले जाईल. तांत्रिक समितीचा निर्णय अंतिम असेल.

8. आयपीएलमध्ये यंदा कोणते नवे नियम
संघांना आता एका डावात एका ऐवजी दोन रिव्ह्यू मिळतील. कॅच आऊट झाल्यास नवीन फलंदाजाला पुढच्या चेंडूला सामोरे जावं लागेल. आतापर्यंत असं होतं की शॉट मारणाऱ्या खेळाडूने दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या फलंदाजाला ओलांडलं तर दुसऱ्या टोकावरील फलंदाज स्ट्राइक रेट घेतो. नवीन करारात असं होणार नाही. जर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर फलंदाज बाद झाला तर नवीन फलंदाज पुढच्या पहिल्या चेंडूवर स्ट्राइक घेणार नाही. तो दुसऱ्या टोकाला जाईल.

9. प्रेक्षकांना स्टेडिअममध्ये परवानगी
स्टेडियमच्या क्षमतेच्या 25 टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर प्रेक्षकांना स्टेडियममध्ये जाण्याची परवानगी दिली जाईल

10. बायो-बबलमध्ये किती बदल झाला? नवीन नियम काय आहेत?
यावेळी बायो बबलचे नियम काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी खेळाडू आणि सदस्यांना सात दिवस क्वारंटाईन व्हावं लागलं होतं. यावेळी तो कालवधी कमी करण्यात आला आहे. खेळाड आणि सदस्यांना यंदा फक्त तीन दिवस क्वारंटाईन व्हावं लागेल. तीन दिवसांच्या कालावधीत २४ तासांच्या अंतराने कोरोना चाचणी केली जाईल.

Read More