Marathi News> मुंबई
Advertisement

पाहा झी २४ तासचा कानोसा । मुंबईत कोण मारणार बाजी?

मुंबईत काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. झी २४ तासने आपला निवडणूक निकालाबाबत कानोसा घेतला आहे.

पाहा झी २४ तासचा कानोसा । मुंबईत कोण मारणार बाजी?

मुंबई : एक्झिट पोलनंतर राज्यात काय परिस्थिती असेल याचे अंदाज बांधण्यात आले होते. मात्र, मुंबईत काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. झी २४ तासने आपला निवडणूक निकालाबाबत कानोसा घेतला आहे. त्यानुसार निकालाचे चित्र वेगळे असून शकते असेच दिसून येत आहे. मागील लोकसभा निवडणुकीत युतीची कामगिरी चांगली होती. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत युतीला दोन ते तीन जागांवर फटका बसताना दिसत आहे. त्यांच्या जागा कमी होताना दिसत आहेत. मुंबई येथील जागांचा विचार करताना शिवसेनेला मोठा फटका बसताना दिसत आहेत.  

कोकण आणि मुंबई या विभागात एकूण १२ मतदारसंघ येतात. यात शिवसेना ५, भाजप ४, काँग्रेस १, राष्ट्रवादी १ आणि बविआ १ अशा जागा जिंगण्याची शक्यता आहे. मुंबईत ६ जागा आहेत. येथे युतीच्या दोन जागा कमी होण्याचा धोकाही आहे. या जागा काँग्रेस आघाडीला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे युतीला फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र, मुंबईत भाजपला यश मिळताना दिसत आहे. तर मुंबईत शिवसेनेलाच फटका बसताना दिसत आहे. भाजपने आपली कामगिरी चांगली केल्याचे दिसत आहे.

दक्षिण मुंबईतून काँग्रेसचे मिलिंद देवरा जिंकण्याची शक्यता असून शिवसेनेचे अरविंद सावंत यांना पराभवाचा सामना पत्करावा लागणार आहे. तर दक्षिण मुंबईत शिवसेनेचे राहुल शेवाळे जिंकतील तर काँग्रेसचे एकनाथ गायकवाड पराभूत होण्याचा धोका जास्त आहे.

उत्तर मुंबईतून भाजपच्या पूनम महाजन पुन्हा जिंकण्याची शक्यता आहे. येथे काँग्रेसकडून प्रिया दत्त पराभवाच्या छायेत दिसत आहेत. मात्र, असे असले तरी पूनम महाजन या मतदार संघात पाच वर्षात म्हणाव्या तशा फिरकल्याच नाहीत. त्यामुळे येथे नाराजी आहे. याचा कदाचित फटकाही बसू शकतो.

उत्तर पूर्व मुंबईत भाजपने येथे भाकरी फिरवली आहे. विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना डावलून मनोज कोटक यांना उमेदवारी दिली. ते जिंकण्याची शक्यता आहे. मात्र राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील यांनी जोरदार टक्कर देण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जरी भाजपला कौल मिळत असला तरी कोटक यांच्यासाठी धोक्याची घंटा असू शकते. ते २३ मे रोजीच स्पष्ट होईल.

उत्तर पश्चिम मुंबईतून शिवसेनेच गजानन किर्तीकर हे विजयी होतील तर काँग्रेसचे संजय निरुपम यांना पराभवाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

तर उत्तर मुंबईतून भाजपचे गोपाळ शेट्टी यांना काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी जोरदार टक्कर दिली आहे. येथे काहीही होऊ शकते, अशी शक्यता आहे. मात्र, गोपाळ शेट्टी यांचे पारडे अधिक उजवे दिसत आहेत. त्यामुळे तेच जिंकू शकतात, असेच दिसून येत आहे. त्यांनी आपला विजय निश्चित असल्याचे म्हटले आहे. त्यांनी २००० किलोच्या मिठाईची ऑडरही दिली आहे. त्यांनी विजयासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे.

Read More