Marathi News> मुंबई
Advertisement

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत ?

 कोरानाचे नियम पाळत इतक्या लोकांची राहण्याची सोय कशी करायची ?

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत ?

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : कोरानाच्या पार्श्वभूमीवर यंदा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत घेण्याचा विचार सुरू आहे. याबाबत नागपूर इथली तयारी कितपत आहे याचा आज आढावा घेतला जाणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता, अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत घेण्याचा आग्रह वाढू लागला आहे. 

नागपूरला अधिवेशन घ्यायचे ठरल्यास सगळा शासकीय लवाजमा मुंबई आणि इतर जिल्ह्यातून नागपूरला हलवावा लागतो. कोरानाचे नियम पाळत इतक्या लोकांची राहण्याची सोय कशी करायची ? हासुद्धा मोठा प्रश्न आहे. तर नागपूरचे आमदार निवास कोविड सेंटर म्हणून वापरात होते. त्यामुळे आमदार निवासात रहायला आमदारांचाही विरोध वाढू लागलाय. 

राज्यातील रुग्णसंख्या 

काल राज्यात ५,२४६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात काल ११७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९२,५०,२५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,०३,४४४ (१८.४२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १२,५२,७५८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२,००३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

काल राज्यात ५,२४६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १७,०३,४४४ झाली आहे. आज मृत्यू रिकॉन्सिलिएशन प्रक्रियेमुळे काही जिल्हे आणि मनपाच्या प्रगतीपर मृत्यू संख्येत वाढ झाली आहे. ही वाढ कोल्हापूर -२६, कोल्हापूर मनपा -१०, सोलापूर - २९, सांगली -५१ आणि नांदेड -२३ अशी आहे.  त्यामुळे राज्याच्या एकूण मृत्यू संख्येत १३९ ने वाढ झाली आहे.

Read More