मुंबई : संजय राऊत यांनी आज ट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही अटलजींच्या मार्गावर असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. गीतेचा एक श्लोक शेअर करत अग्नीपरीक्षेच्या या काळात अर्जुनाप्रमाणे उद्घोष केला पाहिजे. आव्हानांपासून पळून न जाता लढलं पाहिजे असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा नाव न घेता भाजपला टोला लगावला आहे.
आग्नेय परीक्षा की
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 8, 2019
इस घड़ी में-
आइए, अर्जुन की तरह
उद्घोष करें :
‘‘न दैन्यं न पलायनम्।’’
- अटल बिहारी वाजपेयी
(गीता का संदेश- *न दैन्यं न पलायनम्* अर्थात कोई दीनता नहीं चाहिए , चुनौतियों से भागना नहीं , बल्कि जूझना जरूरी है)
सत्तासंघर्षाचा आजचा १६ वा दिवस आहे. आज १३ व्या विधानसभेचा कार्यकाल संपत असल्यानं देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. एक तांत्रिक बाब म्हणून फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. यामुळे आता राज्यपालांची भूमिका महत्त्वाची ठरणार असून राज्यपालांच्या भूमिकेकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. तर फडणवीसांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना काय भूमिका घेते हे पाहणंदेखील महत्त्वाचं ठरणार आहे.
शिवसेनेचे सारे आमदार रंगशारदा हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. शिवसेना आज नरमाईची भूमिका घेते की अन्य पर्यायांचा विचार करते, याभोवती सत्तास्थापनेचं नाट्य रंगेल. तर काँग्रेसच्या गोटात आमदार फुटतील की काय असं भीतीचं वातावरण निर्माण झालंय आहे यामुळे काँग्रेस आपल्या आमदारांना जयपूरला हवलण्याच्या तयारीत आहे.
शरद पवार हे सातारच्या दौऱ्यावरुन कालच मुंबईत दाखल झाल्यानं आता ते काय चाल खेळतात याकडे साऱ्यांचं बारीक लक्षं असेल. एकंदरच सत्तासंघर्षनाट्याचा आजचा दिवस हा महत्त्वाचा ठरणार आहे.