Marathi News> मुंबई
Advertisement

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार मिळणे कठिण, एसटी महामंडळाला हवेत ३०० कोटी

लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाचं दर दिवशी २१ कोटींचं नुकसान होत आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार मिळणे कठिण, एसटी महामंडळाला हवेत ३०० कोटी

मुंबई : लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाचं दर दिवशी २१ कोटींचं नुकसान होत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला ३०० कोटींची मदत द्या, नाही तर एप्रिल मे महिन्यांचे पगार धोक्यात आहे, अशी मागणी इंटकने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. दरम्यान, हे ३०० कोटी रुपये मिळाले नाहीतर एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळणे कठिण होऊन बसणार आहे, अशी चर्चा एसटी कामगांमध्ये सुरु आहे.

महाराष्ट्रात सध्या अविरतपणे परप्रांतीय मजूर, विद्यार्थी यांची ने आण करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे पगार मात्र धोक्यात आहेत. सरकारने एसटी महामंडळास ३०० कोटी रुपये द्यावेत नाही तर कर्मचाऱ्यांचं वेतन करणेही अशक्य आहे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस या संघटनेनं केलीय. राज्य परिवहन कर्मचा-यांचे दरमहा वेतन अदा करण्यासाठी सुमारे २५० कोटी रूपये लागतात. त्यामुळे रा.प. महामंडळाकडे कर्मचा-यांच्या वेतनाकरीता पुरेशी रक्कम उपलब्ध नाही. 

शासनाने विविध प्रवास सवलतींसाठी द्यायची रक्कम आणि अर्थसहाय्य दिल्याशिवाय एप्रिल महिन्याचे कर्मचा-यांचे वेतन अदा करणं शक्य नाही अशी मागणी करण्यात आलीय. एप्रिल आणि मे महिन्याचं वेतन एकाच टप्प्यात देण्याचा सरकारचा आदेश आहे. मात्र एसटीकडे वेतन देण्यासाठी रक्कम नसल्याने १ मे आणि ७ मे या दिवशी कर्मचारी अधिकाऱ्यांना वेतन देण्यात आलेलं नाही. 

Read More