Marathi News> मुंबई
Advertisement

आता प्लास्टिकची पिशवी सापडल्यास दुकानाला टाळे - पर्यावरण मंत्री

आता शिल्लक असलेला माहल संपविण्यासाठीची तीन महिन्यांची मुदत संपली आहे. यापुढे प्लास्टिकची पिशवी सापडल्यास दुकानाला टाळे.

आता प्लास्टिकची पिशवी सापडल्यास दुकानाला टाळे - पर्यावरण मंत्री

मुंबई : प्लास्टिकचा असलेला साठा संपविण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. आता ही मुदतही संपलेली आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदीसाठी राज्यसरकारने कठोर पावले उचलली आहेत. आता दुकानात एखादी जरी प्लास्टिकची पिशवी आढळल्यास त्या दुकानाचा परवाना रद्द होईल. शिवाय दुकानाला टाळे ठोकण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली.

युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज प्लास्टिक बंदी संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी प्लास्टिक बंदीसाठी पर्यावरण खात्याला कठोर पावलेउचलण्याचे आदेश देण्यात आल्याचे मंत्री रामदास कदम यांनी सांगितले. प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी पर्यावरण खात्याने कठोर पावले उचलली आहेत. त्यानुसार प्लास्टिक वापरणार नसल्याचं दुकानदारांकडून प्रतिज्ञापत्रावर लिहून घेतलं जाणार आहे. संधी देऊनच ही कारवाई करण्यात येणार आहे. 

कोणत्याही दुकानात कॅरी बॅग, प्लास्टिकच्या वस्तू अथवा प्लास्टिक पॅकेजिंग मटेरियल आढळून आल्यास तातडीने दुकानाचा परवाना रद्द करण्याचे निर्देश रामदास कदम यांनी आज दिले.  गणपती उत्सवाच्या काळात थर्माकोलवर शंभर टक्के बंदी केली तसेच येणाऱ्या नवरात्र, दसरा आणि दिवाळीतही थर्माकोल आणि प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे. आतापर्यंत राज्यात 290 टन प्लास्टिक जप्त केले असून प्लास्टिक बंदीबाबत भारतात मोठ्या प्रमाणात जनजागृती होत असल्याबद्दल युनो आणि इंग्लंड देशाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने देखील महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी केल्याबद्दल शासनाचे अभिनंदन केले असून महाराष्ट्राप्रमाणे देशातील अन्य राज्यांनी मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक येत असल्याचे सांगून कदम म्हणाले, पोलिसांनी ट्रक जप्त करुन कारवाई केली पाहिजे. जर दुकानात प्लास्टिक आढळले तर दुकानांवर कारवाई करुन त्यांचे परवाने रद्द करण्याची शिफारस करावी. पर्यटन आणि देवस्थानच्या ठिकाणी प्लास्टिक कॅरीबॅग मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. तेथेही पोलीस आणि प्रदुषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करावी. जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषदेने मोठ्या प्रमाणात कापडी पिशव्या तयार करुन त्या दुकानांवर आणि ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. लवकरच 25 लाख पिशव्या तयार होत असून त्या बाजारात उपलब्ध होतील.  यापुढे राज्यभर दौरा करुन प्लास्टिक संदर्भात महसूल निहाय आढावा घेणार असल्याचे  कदम यांनी शेवटी सांगितले.

Read More