मुंबई : गेले काही दिवस सरकारवर आणि भाजपावर आसूड ओढणाऱ्या सामनाने आजच्या अग्रलेखात नरमाईचा सूर लावलाय. गेल्या महिन्याभरातल्या शेतकरी आत्महत्यांनी महाराष्ट्र हादरला आहे. सामनाने हाच धागा पकडून 'शेतकऱ्यांचे तळतळाट घेऊ नका' या शिर्षकाखाली सरकारला तातडीने भक्कम मदतीचं आवाहन केलंय.
मराठवाड्यात गेल्या महिनाभरात तब्बल ६८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर येतंय. तर गेल्या १० महिन्यांत ७४० शेतकऱ्यांनी जीव संपवलाय. यावरच, 'हतबल शेतकरी केंद्र सरकारकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे तळतळाट घेऊ नका, तातडीने भक्कम आधार देऊन त्यांचे प्राण वाचवा, एवढेच आमचे सरकारला सांगणे आहे' असं या अग्रलेखात म्हटलं गेलंय.
राष्ट्रपती राजवटीतील सरकारने अजूनही ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही. शिवाय राज्यपालांनी जी मदत जाहीर केली तीही इतकी तुटपुंजी आहे की त्यातून शेतकऱ्यांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही, असा उल्लेखही यात करण्यात आलाय.
दरम्यान, महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेबाबत जलदगतीने निर्णय घ्या अशी मागणी शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी कडे केल्याची माहिती 'झी २४ तास'ची सहकारी वाहिनी 'झी न्यूज'च्या सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत चर्चा सुरु आहे. मात्र, अद्यापही त्यातून ठोस निर्णय लागत नाही. दरम्यान शरद पवार यांनी सोमवारी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर बाहेर आल्यावर आमची महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेवर किंवा शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काहीही चर्चा झाली नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं. त्यामुळे शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांच्या एका गटात असंतोषाचं वातावरण निर्माण झालंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना याची कल्पना आल्यानं त्यांनी 'सत्ता स्थापनेचा निर्णय जलदगतीनं घ्या' अशी मागणी केलीय. यासाठी ते काँग्रेस-राष्ट्रवादीला १ डिसेंबरची मुदतही देऊ शकतात. १ डिसेंबर पर्यंत सरकार स्थापन न झाल्यास शिवसेना दुसऱ्या पर्यायाचा विचार करु शकते, अशी माहिती 'झी न्यूज'च्या सूत्रांनी दिलीय.