Marathi News> मुंबई
Advertisement

नीरव मोदीच्या कंपनीचा सीएफओ अंबानीसह आणखी ५ जण अटकेत

नीरव मोदीच्या फायरस्टार डायमंड कंपनीचा सीएफओ विपुल अंबानीसह आणखी ५ जणांना अटक करण्यात आली आहे. 

नीरव मोदीच्या कंपनीचा सीएफओ अंबानीसह आणखी ५ जण अटकेत

मुंबई : नीरव मोदीच्या फायरस्टार डायमंड कंपनीचा सीएफओ विपुल अंबानीसह आणखी ५ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, नीरव मोदी निर्दोष असल्याच्या दावा त्याच्या वकिलाने केलाय.

उद्योगपती मुकेश अंबानींचा चुलत भाऊ

नीरव मोदीची कंपनी फायर स्टार डायमंड्स या कंपनीचा सीईओ आणि उद्योगपती मुकेश अंबानींचा चुलत भाऊ विपुल अंबानीला अटक करण्यात आलीय. याशिवाय नीरव मोदीच्यावतीनं पंजाब नॅशनल बँकेशी करार करणारऱ्या एक महिला आणि दोन पुरुष अधिकाऱ्यांनाही सीबीआयनं अटक केलीय. 

विपुल अंबानीसोबत कविता मणिकर, अर्जून पाटील, कपिल खंडेलवाल, नितेन शाही अशी या सर्वांची नावं आहे. हे सर्व जण नीरव मोदीच्या तीन कंपन्या डायमंड आर अस, स्टेलर डायमंड, सोलर एक्सपोर्ट यांच्यासाठी काम करत होते. सीबीआयनं ३१ जानेवारीला दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे अटक करण्यात आली. दरम्यान सलग सहाव्या दिवशी ईडीनं विविध ठिकाणी छापे मारून १० कोटींची संपत्ती जप्त केलीय. 

बॅंकेच्या माजी अधिकाऱ्यांनाही अटक

दरम्यान, नीरव मोदी यांना पंजाब नॅशनल बॅंकेला ११ हजार ४०० कोटींना चुना लावलाय. त्यानंतर तो परदेशात कुटुंबीयांसह पळून गेलाय. नीरव मोदीला मदत करणाऱ्या बॅंकेच्या आजी-माजी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.त्याचवेळी नीरव मोदीने बॅंकेला धमकावल्याचे वृत्त पुढे आलेय. बॅंकेनेनेच माझी बदनामी केली. त्यामुळे माझ्या व्यवसायाची बदनामी झालेय. त्यामुळे मी बॅंकेचे कर्ज फेडू शकत नाही, असे म्हटलेय.

मोदी आणि मेहूल चोकशीची टीम  

पंजाब नॅशनल बॅंकेचे अधिकारी यांच्या मार्फत पंजाब नॅशनल बँकेचेच पैसे वापरुन नीरव मोदी आणि मेहूल चोकशी टीम गेली ७ वर्षे पंजाब नॅशनल बॅंकेला फसवत होता १५ फेब्रुवारीला पंजाब नॅशनल बॅंकेनं पत्रकार परीषद घेऊन बॅंकेच्या काहीच अधिकाऱ्यांनी नीरव मोदीला मदत केल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार बॅंकेचा व्यवस्थापक गोकुळ शेट्टी आणि एक खिडकी अधिकारी मनोज खरातला अटक करण्यात आली. पण तपासात गोकुळनाथ शेट्टीच्या वरीष्ठांनी जाणीवपूर्वक त्याच्या व्यवहाराकडे दुर्लक्ष करुन एक प्रकारे त्याला मदतच केल्याचे उघड होताच बेचू यादव, यशवंत जोशी आणि प्रफुल्ल सावंत या पीएनबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सीबीआयने अटक केली.

२० हजार कोटींचा गंडा घातला - चव्हाण

दरम्यान, नीरव मोदीनं बँकांना २० हजार कोटींचा गंडा घातला आहे. मात्र देशातल्या एवढ्या मोठ्या घटनेवर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली काहीच बोलत नसल्याबद्दल, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अरुण जेटलींवर जोरदार टीका केली. 

ज्यांच्या खात्याचा हा विषय आहे ते केंद्रीय अर्थमंत्री काहीच बोलत नसून, इतर केंद्रीय मंत्रीच पुढे येऊन खुलासे करत असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाणांनी केला. लोकांचा बँकिंग व्यवस्थेवरून विश्वास उडत चालल्याची टीकाही त्यांनी केली.

Read More