Marathi News> मुंबई
Advertisement

पावसाळी अधिवेशनाआधी प्रकाश मेहता यांचं मंत्रीपद जाणार ?

चौकशी अहवालात दोषी असल्याचा ठपका 

पावसाळी अधिवेशनाआधी प्रकाश मेहता यांचं मंत्रीपद जाणार ?

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुंबईतील ताडदेव येथील एम.पी.मिल कंपाऊंड एसआरए घोटाळ्याप्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता दोषी असल्याचा ठपका लोकायुक्त न्यायमूर्ती एम.एल. ताहलीयानी यांनी आपल्या चौकशी अहवालात ठेवला आहे. लोकायुक्तांच्या या अहवालामुळे प्रकाश मेहता चांगलेच अडचणीत आले असून त्यांचे मंत्रीपद धोक्यात आले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ताडदेव येथील एम. पी. मिल कंपाऊड एसआरए प्रकल्पाला मंजूरी देताना मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा प्रकाश मेहता यांनी या प्रकरणाच्या फाईलवर मारला होता. मात्र प्रत्यक्षात मेहता यांनी याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना अवगतच केले नसल्याचे चौकशीत समोर आले आहे. 

येत्या १७ जूनपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात सरकार हा अहवाल मांडण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वी मुख्यमंत्री प्रकाश मेहता यांची मंत्रीमंडळातून गच्छिंती करणार का याकडे लक्ष लागलं आहे.

प्रकाश मेहता यांनी मंत्री म्हणून आपली जबाबदारी निष्पक्ष पार पाडली नसल्याचा ठपका लोकायुक्तांचा चौकशी अहवालात ठेवण्यात आला आहे. एम. पी मिल एसआरए प्रकल्प मंजूर करून विकासक ए. डी. कार्पोरेशनला ५०० कोटी रुपयांचा फायदा मिळवून देण्याचा प्रकाश मेहतांचा उद्देश होता, असा आरोप विरोधकांनी हा घोटाळा उघडकीस आणताना केला होता. जुलै २०१७ रोजी मुंबईत पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी हा घोटाळा समोर आणला होता. या घोटाळ्याप्रकरणी प्रकाश मेहतांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांनी विधानसभेत केली होती. 

विरोधक याप्रकरणी आक्रमक असल्याने मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणाच्या चौकशीचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाप्रमाणे ६ सप्टेंबर २०१७ रोजी याप्रकरणाचा तपास लोकायुक्तांकडे सोपवण्यात आला. लोकायुक्तांनी याप्रकरणाची चौकशी करून आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे.

Read More