Marathi News> मुंबई
Advertisement

'मोदी-शहा यांनी लिहून दिलेल्या स्क्रिप्टनुसार महाराष्ट्रात राजकीय फोडाफोडी'

महाविकास आघाडी भाजपाविरोधात सक्षमपणे आणि एकजुटीने लढा देईल असा विश्वास काँग्रेसने व्यक्त केला आहे. राज्यातील राजकीय घडामोडींवर आज काँग्रसेची बैठक झाली. या बैठकीत राजकीय परिस्थिती आणि आगामी रणनितीवर चर्चा करण्यात आली. 

'मोदी-शहा यांनी लिहून दिलेल्या स्क्रिप्टनुसार महाराष्ट्रात राजकीय फोडाफोडी'

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात एक असंवैधानिक सरकार सत्तेवर असून अपात्रतेच्या मुद्द्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात पुन्हा फोडाफोडीचं राजकारण (Maharashtra Politcs) करण्यात आलं आहे. भाजपाच्या (BJP) ऑपरेशन कमळचा हा प्रकार जनतेला आवडलेला नाही. कर्नाटकच्या जनतेने भाजपाला घरी बसवले आहे अशी टीका कर्नाटकचे मंत्री आणि महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील (HK Patil) यांनी केली आहे. महाराष्ट्रात आधी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आणि आता शरद पवार (Sharad Pawar) यांना काही आमदार सोडून गेले आहेत. पण या दोन्हीही नेत्यांच्या मागे आजही मोठं जनसमर्थन आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत आणि भाजपाविरोधात एकजुटीने, सक्षमपणे यशस्वी लढा देऊ, असं एच के पाटील यांनी स्पष्ट केलं. 

काँग्रेसची बैठक
विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधान भवनातील कार्यालयात काँग्रेस पक्षाच्या सर्व विधानसभा-विधानपरिषद सदस्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, कार्याध्यक्ष नसीम खान, बस्वराज पाटील, आ. कुणाल पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव संपतकुमार, आशिष दुआ यांच्यासह काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार उपस्थित  होते. 

देशात मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांची एक मोठी आघाडी होत आहे. विरोधकांची वाढती ताकद पाहून भारतीय जनता पक्ष बिथरला असून नैराश्येतून पक्ष फोडण्याचे काम भाजपा करत आहे. या पक्षफोडीसाठी ईडी, सीबीआय अशा तंत्रांचा वापर केला जात आहे असा आरोपी एच के पाटील यांनी केला. महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण सुरु असताना काँग्रेस पक्ष एकजूट आणि मजबूतपणे उभा असून पक्षनिष्ठा काय असते हे त्यांनी या एकजूटीतून दाखवून दिलं आहे. या बैठकीला 39 आमदार उपस्थित होते, जे आमदार या बैठकीला उपस्थित नव्हते त्यांनी आम्हाला त्याची सुचना आधीच दिली होती. काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात एकजूट असून मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांच्या मार्गदर्शानाखाली काम करत आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्ष एक मोठी ताकद म्हणून राज्यात उभी राहिल असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

योग्यवेळी विरोधी पक्षनेते पदासंदर्भात सर्व घटकांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या बैठकीत राज्यातील सद्य राजकीय परिस्थीतीवर चर्चा करण्यात आली, सर्वांनी मते मांडली. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत काँग्रेस पक्ष म्हणून पुढची रणनिती काय असावी यावरही चर्चा झाली. महानगरपालिका, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसंदर्भात एच. के. पाटील यांनी मार्गदर्शन केले. महाविकास आघाडी म्हणून भाजपाविरोधात लढण्यावर चर्चा झाली. काँग्रेस पक्ष आगामी पावसाळी अधिवेशनातही सरकारविरोधात जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवत राहिल असं यावेळी बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

'मोदी-शहांचं स्क्रिप्ट'
भाजपा जनतेचे मुळ विषयापासून दुसरीकडे लक्ष हटवण्यासाठी इतर मुद्द्यांना चर्चेत आणत असते. पण काँग्रेस पक्ष जनतेचे प्रश्न हाती घेऊन सरकारला जाब विचारेल आणि भाजपाचा खरा चेहरा उघडा करेल. महाराष्ट्रात जे राजकीय नाट्य सुरु आहे ते मोदी-शहा दिल्लीतून जी स्क्रिप्ट लिहून देतात त्याप्रमाणे होत आहे असा आरोप यावेळी नाना पटोले यांनी केला. काही लोकांना ईडी सीबीआयची भिती दाखवली जात आहे. भाजपाचे नाही ऐकले तर जेलमध्ये जावे लागेल या भितीतून हे सर्व सुरु आहे. महाराष्ट्रात जे राजकारण सध्या सुरु आहे ते दुःखद आहे. भूषणावह नाही. शाहु, फुले, आंबडेकरांच्या महाराष्ट्रात अशा पद्धतीचे घाणेरडे राजकारण होत आहे हे जनतेला पटलेले नाही.
राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर काँग्रेस लक्ष ठेवून आहे आज आमची वेट अँड वॉच ची भूमिका आहे. विरोधी पक्ष नेतेपदाबाबत ज्या पक्षांची सदस्य संख्या जास्त त्याच पक्षाचा विरोधी पक्ष नेता होतो. खासदार शरद पवार यांनी यासंदर्भात भूमिका जाहीर केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्या दोन स्वतंत्र बैठका होत आहेत, त्यानंतर उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याशी चर्चा करुन पुढील रणनिती ठरविली जाईल, असं नाना पटोले यांनी सांगितलं.

Read More