Marathi News> मुंबई
Advertisement

भाजपला धक्का, नारायण राणेंचा पक्ष स्वबळावर लढणार

पण नारायण राणे खासदारकीचा राजीनामा देणार नाही.

भाजपला धक्का, नारायण राणेंचा पक्ष स्वबळावर लढणार

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या काही जागा लढणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याआधीही त्यांनी याची घोषणा केली होती पण भाजपसोबत जवळीक वाढल्यानंतर ते भाजपचे खासदार झाले. पण युती करताना शिवसेनेचा याला विरोध होता. गेल्या चार वर्षांपासून एकमेकांव टीका करणाऱ्या शिवसेना आणि भाजपची युती होताच राणेंचा पत्ता आपोआपच कट झाला असल्याची चर्चा आहे. भाजपच्या जाहीरनामा समितीमधून वगळण्यासाठी ते भाजपला कळवणार असल्याचं देखील नारायण राणे यांनी म्हटलं आहे. 'युती होणारच याचे भाकित मी सुरुवातीपासून करत होतो. लाथाडत असले तरी एकत्र येणार हे माहित होते. युती होऊनही दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसत नव्हता. स्वबळाच्या घोषणेच्या ठरावाचे काय झाले? एका बाजूला सत्ता उपभोगली तर दुसरीकडे एकमेकांवर टीका केली. मातोश्रीचा स्वार्थ आणि बचावासाठी ही युती आहे. पण दोन्ही पक्षांना या युतीचा फायदा होणार नाही. युती झाली पण मनं जुळली नाहीत. सैनिक आणि भाजपाचे कार्यकर्ते लढायला समोर ठाकले आहेत. साडेचार वर्षे जी टीका झाली त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते नाराज आहेत. युती झाल्याचे कुठेही समाधान नाही.' असं वक्तव्य नारायण राणेंनी केलं आहे.

'तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना यासाठी ही युती आहे. या देशात सर्वात जास्त भ्रष्टाचार मुंबई महापालिकेत होतो. भ्रष्टाचाराने जमवलेले पचवायचे कसे यासाठी ही युती झाल्याचा आरोप देखील राणेंनी केला. स्वबळावर लढणार म्हणून ठराव झाला. भाजपाच्या २५ मतदारसंघात शिवसेनेच्या लोकांनी लढायची तयारी केली होती. तिथे ते भाजपला कसे मतदान करतील. तसेच भाजपाबाबत देखील आहे.'

नारायण राणे स्वबळावर लढणार

मी स्वबळावर लढणार नाही तर काय घरी बसणार का असं देखील राणेंनी म्हटलं. राजीनामा द्यायचा कुठे संबंध येतो. मी भाजपचा सदस्य नाही तर राजीनामा कसा देणार. मी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देणार नाही. त्यांनी जाहीरनामा समितीवर मला घेतले आहे. आता माझा पक्ष वेगळी निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे मी दोन पक्षाचे जाहीरनामे तयार करू शकत नाही. मी भाजपला लेखी कळवणार आहे. जाहीरनामा समितीतून मला वगळावे. असं देखील राणेंनी स्पष्ट केलं आहे.

आघाडी नाही, पण पाठिंबा दिला तर घेईल.

लोकसभा निवडणुकीत राज्यात काही जागा आणि विधानसभेच्या जागा लढवणार असल्याचं नारायण राणे यांनी जाहीर केलं आहे. मी लोकसभा लढवणार नाही. विधानसभा लढवायची की नाही हे लोकसभा निवडणुकीनंतर ठरवणार आहे. महाआघाडीत जाण्याचा विचार नाही. आघाडीने पाठिंबा दिला तर मी घेणार असं देखील राणेंनी म्हटलं आहे.

शिवसेनेवर टीका

संजय राऊत यांनी भाजपविरोधी प्रचंड लिखाण केले होते. पण संजय राऊत यांनी स्वत:चीच फजिती करून घेतली आहे. आता शिवसेनेकडे नीतीमत्ता राहिलेली नाही. बाळासाहेब असताना ती होती. मुंबईतील मराठी माणसाची टक्केवारी कमी झाली याला शिवसेना जबाबदार आहे. निवडणुकीत माझा प्रहार भाजपवर नसेल. काही गोष्टींचा संयम मी पाळणार आहे कारण त्यांनी मला खासदार केले आहे. शिवसेनेला विधानसभेत यावेळी २५ जागाही मिळणार नाही. तर लोकसभेत १० जागांवरही जाणार नाही असं वक्तव्य राणेंनी केलं आहे.

Read More