Marathi News> मुंबई
Advertisement

'कोणी कोणाचा नातेवाईक पण...', EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर रविंद्र वायकर यांनी फेटाळले आरोप

Ravindra Waikar On EVM : नवनिर्वाचित खासदार रविंद्र वायकर यांच्या नातेवाईकासह निवडणूक अधिकारी अशा दोघांविरुद्ध वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल (Ravindra Waikar Kin Booked By Police) केलाय. त्यावर आता वायकरांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

'कोणी कोणाचा नातेवाईक पण...', EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर रविंद्र वायकर यांनी फेटाळले आरोप
Updated: Jun 16, 2024, 05:20 PM IST

Ravindra Waikar Kin Booked By Police: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातली निवडणूक वादाच्या भोवऱ्यात सापडलीय. या निकालाच्या मतमोजणी दरम्यान गैरप्रकार झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाचे पराभूत उमेदवार अमोल कीर्तिकरांनी केलाय. मात्र या प्रकरणात आता गोरेगाव पोलिसांनीही गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेनेचे विजयी खासदार रवींद्र वायकर यांचे नातेवाईक मंगेश पंडिलकर आणि निवडणूक अधिकारी दिनेश गुरव यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास सक्त मनाई असते. मात्र मतमोजणीदरम्यान रवींद्र वायकरांचे नातेवाईक मंगेश पंडिलकर हे मोबाईल घेऊन आले होते. निवडणूक अधिकारी दिनेश गुरव यांनी त्यांना मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी दिली. मंगेश पंडिलकर हे मतमोजणी केंद्रात मोबाईलचा वापर करत असल्याचा आरोप करण्यात आलाय. भारत जन आधार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीवरुन गोरेगावच्या वनराई पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. या दोघांनाही चौकशीसाठी पोलीस समन्सही बजावणार आहेत. अशातच आता या प्रकरणावर रविंद्र वायकर यांनी मोठं वक्तव्य केलंय.

काय म्हणाले Ravindra Waikar ?

हा सर्व रडीचा डाव सुरु आहे. बाकी काहीही नाही. यात दूध का दूध पाणी का पाणी सर्व होऊन जाईल. हे ट्विट कोणी केलं आहे. संपूर्ण देशात लोकसभेचे मतदान झाले आहे. या लोकसभा निवडणुकीच्या सर्वत्र निकाल जाहीर झाले. या निकालाप्रमाणे माझाही निकाल आला. मी इथे पावणे सहापर्यंत होतो. मी सहा वाजता तिथे गेलो. सहा वाजता गेल्यानंतर त्याच्याआधीच तुम्ही उमेदवाराला विजयी घोषित करुन टाकलं. त्यावेळी एक लाख मत मोजणी बाकी असताना तुम्ही पाच वाजता त्याला विजयी घोषित केलं. त्यामुळे मी तिथे गेलो. नाहीतर तिथे गेलोही नसतो. त्यानंतर एक ते दीड तासांनी निकाल जाहीर झालेत. बॅलेट पेपरची मतमोजणी ही सकाळी 8 ला झाली आहे. त्यात त्यांना 1501 मतं मिळाली आहेत. तर 1550 मतं मला मिळालेली आहेत, असं रविंद्र वायकर म्हणाले.

दुसरीकडे ईव्हीएममध्ये ते एक मतांनी जिंकले आहेत. यानंतर मी 48 मतांनी निवडून आलोय हे जाहीर झाले आहे. तिथे हजारो पोलीस, 20 उमेदवारांचे प्रतिनिधी, 20 उमेदवार स्वत: आणि रविंद्र वायकर जाऊन काहीतरी करु शकतो. हे कसं काय मला अजूनही समजत नाही. यांचा नुसता रडीचा डाव चालला आहे. त्यांच्या जिव्हारी लागलं आहे. त्यामुळे त्यांचे ट्विट आणि हे सर्व सुरु आहे. मी या सर्व गोष्टींना अजिबात महत्त्व देत नाही. इलेक्शन कमिशनने ज्या पद्धतीने निवडणूक घेतली आहे, ती योग्य पद्धतीने घेतली आहे, असंही वायकर यांनी म्हटलं आहे.

दुसरा प्रश्न मोबाईलचा, तिथे किती जणांकडे मोबाईल होते. आतून ज्या काही बातम्या येत असतील, त्यांना कायद्याप्रमाणे जो काही दंड असेल तो बसेलच. म्हणून कोणी कोणाचा नातेवाईक आहे, कोणी ईव्हीएम हॅक केलं, असं होत नाही. त्यामुळे हा सर्व रडीचा डाव सुरु आहे. मला त्यावर उत्तर द्यावसं वाटत नाही. त्यांनी सीसीटीव्ही द्यावा. कोर्टात जाण्याचा हक्क त्यांना आहे, ते बिनधास्त जावं. लोकशाही आहे. त्यांना तो अधिकार आहे, असंही वायकर यावेळी म्हणाले.