Marathi News> मुंबई
Advertisement

'परराज्यातील मजुरांना गावी पाठवले तरी इतर राज्ये त्यांना स्वीकारणार नाहीत'

मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाच्या परिसरात मंगळवारी हजारो उत्तर भारतीय मजुरांनी ट्रेनने आपल्या गावी जाण्यासाठी गर्दी केली होती. 

'परराज्यातील मजुरांना गावी पाठवले तरी इतर राज्ये त्यांना स्वीकारणार नाहीत'

मुंबई: राज्य सरकारने परराज्यातील मजुरांना आपापल्या गावी जाण्याची परवानगी दिली तरी संबंधित राज्यांचे मुख्यमंत्री या लोकांना स्वीकारायला तयार नाहीत, अशी माहिती काँग्रेस नेते नसीम खान यांनी दिली. नसीम खान यांच्या कार्यालयातर्फे बुधवारी एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले. यामध्ये त्यांनी वांद्रे रेल्वे स्थानकाच्या परिसरात मंगळवारी घडलेल्या घटनेचा हवाला देत परराज्यातील मजुरांना आपापल्या गावी जाऊ देण्यासाठी राज्य सरकारकडे विनंती केल्याचे म्हटले आहे.

त्यावेळी सरकारमधील वरिष्ठ नेत्यांनी आम्ही परराज्यातील नागरिकांना त्यांच्या गावी सोडण्यास तयार असल्याचे सांगितले. मात्र, संबंधित राज्यांचे मुख्यमंत्रीच त्यांना स्वीकारण्यास तयार नाहीत, अशी माहिती आपल्याला सत्ताधरी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून मिळाल्याचे नसीम खान यांनी पत्रकात म्हटले आहे.

...तर देशातील मजुरांचा उद्रेक होईल- प्रकाश आंबेडकर

केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या कालावधी वाढवल्यामुळे परराज्यातून आलेल्या मजुरांसमोर मोठा पेच उभा राहिला आहे. लॉकडाऊनमुळे त्यांचे रोजगार ठप्प झाले आहेत. तसेच त्यांच्याकडे राहायलाही जागा नाही. पुरेसे पैसे आणि अन्न मिळत नसल्याने यापैकी अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे नसीम खान यांनी राज्य सरकारपुढे हा मुद्दा मांडला होता. मात्र, संबंधित राज्येच आपल्या लोकांना स्वीकारायला तयार नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. 

लॉकडाऊनमध्येही वांद्रे स्टेशनवर गर्दी, अफवा का षडयंत्र?

मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाच्या परिसरात मंगळवारी हजारो उत्तर भारतीय मजुरांनी ट्रेनने आपल्या गावी जाण्यासाठी गर्दी केली होती. आम्हाला रेल्वेने आमच्या गावी जाऊन दिले जावे, अशी मागणी करत या मजुरांनी वांद्रे रेल्वे स्थानकाच्या परिसरात ठिय्या मांडला होता. यावरून लॉकडाऊन असताना इतक्या मोठ्या संख्येने लोक एकत्र आलेच कसे, असा सवाल विचारत विरोधकांनी ठाकरे सरकारला लक्ष्य करायला सुरुवात केली. त्यावेळी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत या सगळ्याचे खापर केंद्र सरकारवर फोडले होते. 

केंद्र सरकारने कामगारांना त्यांच्या घरी परत पाठवण्यासाठी कोणताच निर्णय घेतला नसल्यामुळे वांद्र्यात अशी परिस्थिती निर्माण झाली. सुरतमध्ये झालेली दंगलही याचाच परिणाम आहे. या कामगारांना अन्न किंवा घर नकोय, त्यांना त्यांच्या घरी जायचे आहे, असे आदित्य यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. यावरून शिवसेना-भाजपमध्ये वाद पेटला होता.

Read More