Marathi News> मुंबई
Advertisement

'मला संपवण्याचा प्रयत्न झाला' देवेंद्र फडणवीस यांचा धक्कादायक आरोप

2019 पासून सुरु होता प्रयत्न... उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

'मला संपवण्याचा प्रयत्न झाला' देवेंद्र फडणवीस यांचा धक्कादायक आरोप

Maharashtra Politics : 2019 मध्ये माझा शेवट करण्याचा प्रयत्न केला, तिघांनी मिळून एकत्रितपणे मला संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला असा धक्कादायक आरोप भाजप (BJP) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केला आहे. पण ते मला संपवू शकले नाहीत आणि संपवू शकणारही नाहीत असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईत घेतलेल्या गटनेत्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला होता.  देवेंद्र फडणवीस यांची ही शेवटची निवडणूक असेल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. याला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आमच्या पाठित खंजीर खुपसला
आमच्यासोबत निवडून आमच्याच पाठित खंजीर खुपसला अशी टीका करत फडणवीस यांनी तेव्हा तुम्ही राजीनामे का दिले नाहीत? तेव्हा का निवडणुका घेतल्या नाहीत? असा सवाल उपस्थित केला. तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत (Congress-NCP) निवडून आला नव्हतात, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटा लावून निवडून आलात असा खोचक टोलाही फडणवीस यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांचं कालचं मेळाव्यातलं भाषण हे निराशेचं होतं, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे यांची अमित शहांवर टीका
मुंबई बळकावयाची आहे. मुंबईवर लचके तोडणारी गिधाडं फिरू लागली आहेत.  अमित शहा (Amit Shah) म्हणाले सेनेला जमीन दाखवा. पण त्यांना माहिती नाही की इथल्या जमिनीत तलवारीची पाती आहेत. मुंबई आमच्यासाठी मातृभूमी आहे. अशी टीका त्यांनी अमित शाह यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी केली. 'आमच्या आईवर वार करणाऱ्याचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. दसऱ्यात लक्तरे काढणारच. कमळाबाईचा व मुंबईचा काय संबंध आहे असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.

Read More