Marathi News> मुंबई
Advertisement

मदत न पोहोचायला कोकण काय गडचिरोली, नंदुरबारसारखा लांब आहे का?- फडणवीस

आज एक महिना उलटूनही कोकणात वीज नाही. सरकारच्या उदासीनता आणि निष्काळजीपणाचे यापेक्षा दुसरे कोणते उदाहरण म्हणायचे? 

मदत न पोहोचायला कोकण काय गडचिरोली, नंदुरबारसारखा लांब आहे का?- फडणवीस

अमित जोशी, झी मीडिया, मुंबई: कोकण हा काही गडचिरोली किंवा नंदुरबार नव्हे. मुंबईपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असूनही कोकणात अजून निसर्ग चक्रवादळातील वाताहतीनंतर मदत पोहोचू शकलेली नाही, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, कोकणात अजूनही पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे नागरिकांना मदत मिळालेली नाही. तर ज्यांना मदत मिळाली आहे, ती अत्यंत तुटपुंजी आहे. 

तरीही कोकणी माणूस स्वाभिमानी आहे. तो म्हणतो मदत नको पण केवळ कचरा साफ करून द्या. पण ही मुलभूत कामंही करण्यास प्रशासन तयार नसल्याची टीका फडणवीस यांनी केली.  आज एक महिना उलटूनही कोकणात वीज नाही. सरकारच्या उदासीनता आणि निष्काळजीपणाचे यापेक्षा दुसरे कोणते उदाहरण म्हणायचे? शेकडो गावांमध्ये वीज नसली तरी भरमसाठ बिले पाठवणे हा तर चक्रीवादळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचे फडणवीसांनी म्हटले. 

कोकणवासियांना सध्या लहानसहान गोष्टींसाठीही एक-एक महिना वाट पाहावी लागत आहे. कोकण हा मुंबईपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहे. तरीसुद्धा कोकणाची ही अवस्था झालेय. त्यामुळे राज्य सरकारने आतातरी कोकणाच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

गेल्या महिन्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळात रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर नुकसान होते. या जिल्ह्यांतील अनेकांची घरे वादळामुळे उद्ध्वस्त झाली होती. तसेच नारळी आणि पोफळीच्या बागांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाल्यामुळे अनेक कोकणवासियांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. अशातच वीजेच्या तारा आणि खांब उन्मळून पडल्यामुळे अनेक गावांमध्ये अजूनही वीज आलेली नाही. त्यामुळे लोकांना मोठया गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. 

Read More