Marathi News> मुंबई
Advertisement

पायर्‍यांवर विरोधकांचं आंदोलन पाहून आमचे दिवस आठवले, पण सभागृहात प्रश्न सुटतील - उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विरोधकांना खोचक शब्दात उत्तर

पायर्‍यांवर विरोधकांचं आंदोलन पाहून आमचे दिवस आठवले, पण सभागृहात प्रश्न सुटतील - उपमुख्यमंत्री

दीपक भातुसे, मुंबई : 'विरोधक काल विधानभवनाच्या पायर्‍यांवर आंदोलन करत होते तेव्हा मला आमचे दिवस आठवले, आंदोलनात ओरडून घसे कोरडे पडायचे तेव्हा कोण गोळ्या द्यायचे,' अशा मिश्किल आणि खोचक शब्दात अजित पवारांनी विरोधी पक्षातील आपल्या दिवसांना उजाळा दिला. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. विरोधक सरकारविरोधात विधानभवनाच्या पायर्‍यांवर बसून घोषणाबाजी करत असतात. तर आज राज्यभर भाजपाचे आंदोलन आहे. या आंदोलनाबाबत अजित पवारांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी वरील खोचक उत्तर दिलं.

अजित पवार यांनी म्हटलं की, 'खरं तर भाजपने आंदोलन करण्याची गरज नव्हती. कालच आम्ही कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. अर्थसंकल्पही जवळ येतो आहे. त्यात शेतकर्‍यांना देण्याचा प्रयत्न असेल. विरोधी पक्षात असलं की जनतेसाठी काही तरी करतोय हे दाखवण्याचा प्रयत्न असतो. आम्हीही हे करायचो. माझी त्यांना विनंती आहे की, जनतेचे प्रश्न सभागृहात मांडले तर त्यातून प्रश्न सुटतील.'

'काल विरोधक पायर्‍यांवर आंदोलन करत होते तेव्हा मला आमचे दिवस आठवले, ओरडून घसा कोरडा व्हायचा. पण आमचे सरकार असे काम करेल की त्यांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही.'

'माळेगाव साखर कारखाना पाच वर्षापूर्वी आमच्या हातातून गेला, आता पुन्हा आमच्या विचारांचे लोक तिथे निवडून आले आहेत. मी सर्व सभासदांचे अभिनंदन करतो.' असं देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Read More