Marathi News> मुंबई
Advertisement

'पाकिस्तानात अडकलेल्या कुटुंबाला मायदेशी आणा' बॉलिवूड दिग्दर्शकाची मुंबई उच्च न्यायालयात याचिका

पत्नी आणि मुलांना पाकिस्तानात बेकायदेशीर रित्या डांबून ठेवल्याचा आरोप

'पाकिस्तानात अडकलेल्या कुटुंबाला मायदेशी आणा' बॉलिवूड दिग्दर्शकाची मुंबई उच्च न्यायालयात याचिका

मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : बॉलिवूड (Bollywood) चित्रपट निर्माता मुश्ताक नाडियादवाला (Mushtaq Nadiadwala) यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये (Mumbai High Court) धाव घेतली आहे. त्यांनी पत्नी आणि आपल्या दोन अल्पवयीन मुलांना पाकिस्तानमधील पत्नीच्या कुटुंबीयांनी बेकायदेशीर रित्या डांबून ठेवल्याचा आरोप केला असून त्यांना भारतात आणण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाला (Union Ministry of External Affairs) द्यावे अशी याचिका दाखल केली आहे. 

याप्रकरमणी उच्च न्यायालयाने याचिकेची दाखल करुन घेत केंद्र सरकारला (Central Government) उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहे. या याचिकेवर 29 ऑगस्ट रोजी सोनवणे होणार आहे

परराष्ट्र मंत्रालयाला नोटीस
बॉलिवूड चित्रपट निर्माता मुश्ताक नाडियादवाला यांनी कुटुंबीयांना परत भारतात आणण्याकरिता भारत सरकारकडे अनेक अर्ज करत पाठपुरावा केला होता. मात्र, केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने कुठल्याही प्रकारची मदत केली नसल्याने अखेर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. 

न्यायालयाने त्यांच्या याचिकेची दखल घेऊन केंद्र सरकारला याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती नितीन जामदार, न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाला नोटीस बजावली. प्रकरणाची सुनावणी 29 ऑगस्टपर्यंत तहकूब केली आहे.

भारत सरकार अपयशी
नाडियादवाला यांनी वकील बेनी चॅटर्जी यांच्यामार्फत ही याचिका केली आहे. पत्नीच्या कुटुंबियाने तिच्यासह आपला 9 वर्षांचा मुलगा आणि 6 वर्षांच्या मुलीला पाकिस्तानात बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवलं आहे. कुटुंबियांना सुरक्षितरीत्या परत आणण्यासाठी नाडियादवाला यांनी केंद्र सरकारच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. 

परंतू त्यांनी कोणताही प्रतिसाद त्यांना मिळाला नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे भारतीय नागरिक असलेल्या आपल्या दोन मुलांना संरक्षण देऊन त्यांना परत आणण्याचे कर्तव्य पार पाडण्यात भारत सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोपही या याचिकेत करण्यात आला आहे

संगोपनाच्या अधिकाराचंही उल्लंघन केल्याचा दावा
पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी आपल्या मुलांना दिलेल्या प्रवास व्हिसाची मुदत ऑक्टोबर 2021 मध्ये संपली असून पत्नी मरियम चौधरी, दोन्ही मुलांना बेकायदेशीरपणे पाकिस्तानात ठेवण्यात आलं आहे. कोणतेही तर्कसंगत कारण न देता पत्नीने भारतात परतण्यास नकार दिला असा दावाही याचिकाकर्त्याने केला आहे. 

याचिकेनुसार या चित्रपट निर्मात्याचे एप्रिल 2012 मध्ये पाकिस्तानी तरूणीशी पाकिस्तानातच लग्न झालं. त्यानंतर ती भारतात आली. इथं  आल्यानंतर तिने भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला. त्यांना दोन मुलंही झाली. नोव्हेंबर 2020 मध्ये मरियम मुलांना घेऊन पाकिस्तानला गेली. 
फेब्रुवारी 2021 मध्ये तिने लाहोर न्यायालयासमोर मुलांच्या कायदेशीर पालकत्वासाठी अर्ज केला. 

न्यायालयानेही तिचा अर्ज मान्य केला. तिथेच राहण्यासाठी पत्नीवर दबाव टाकण्यात आला असावा किंवा तिला तसं शिकवलं गेलं असावं. मुलांना अशाप्रकारे बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवणे केवळ दोन्ही देशांच्या इमिग्रेशन कायद्यांचे आणि मुलांच्या कल्याण आणि संगोपनाच्या अधिकाराचेही उल्लंघन असल्याचा दावा नाडियादवाला यांनी याचिकेत केला आहे.

Read More