Marathi News> मुंबई
Advertisement

सरकारी जमिनी हडपणाऱ्यांना सरकार पाठिशी घालतय, सोमय्यांचा आरोप

सोमय्या यांच्याकडून अनिल परब यांच्या राजीनाम्याची मागणी

सरकारी जमिनी हडपणाऱ्यांना सरकार पाठिशी घालतय, सोमय्यांचा आरोप

मुंबई : सरकारी जमिनी हडपणाऱ्यांना महाविकास आघाडीचे सरकार पाठिशी घालत असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.  

परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हाडाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप सोमय्यांनी केला. असे असतानाही त्यांच्यावर काहीच कारवाई का होत नाही ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. 

अनिल परब यांची म्हाडातील केसची फाईल मी पाहिली. त्यातील अनेक कागदपत्रे गायब असल्याचा दावा सोमय्यांनी केलाय. जुलै २०१९ मध्ये बांधकाम अनधिकृत असल्याचे समोर आल्यानंतरही म्हाडा, पोलिसांनी हे बांधकाम का तोडले नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. 

घाटकोपर मधील महिला गटारीतून वाहून गेल्या प्रकरणी देखील त्यांनी भाष्य केले. इतकं झालं तरी पालिका अधिकारी म्हणतात की यात बीएमसीचा काहीही दोष नाही. चौकशी होण्यापूर्वीच असा खुलासा करणाऱ्या पालिका अधिकारी संजय दराडे यांना सुट्टीवर पाठवावे असे सोमय्यांनी म्हटले. 

गरिबांची एसआरएमधील हक्काची घर महापौर आणि त्यांच्या कुटूंबियांनी हडपली असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. यावर आपण असं काही केलं नसल्याचा खुलासा महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला.दरवेळा प्रत्येक व्यक्तीच्या नावाने धिंगाणे घालायचं पण त्याचे पुढं काय होतं हे कुणालाच माहिती नसते. महापौरांना बदनाम करण्याचा त्यांचा हा डाव उधळला जाणार हे नक्की असेही त्या म्हणाल्या. 

Read More