Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

'कृषी मित्र'च शेतकऱ्यांची 'शत्रू', उधारी वसुलीसाठी गुंडांना 'सुपारी'

कृषी मंत्री दादा भुसे (Minister Dada Bhuse) यांच्या नाशिक जिल्ह्यात (Nashik) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

'कृषी मित्र'च शेतकऱ्यांची 'शत्रू', उधारी वसुलीसाठी गुंडांना 'सुपारी'

चेतन कोळसे आणि योगेश खरे, झी २४ तास, नाशिक : कृषी मंत्री दादा भुसे (Minister Dada Bhuse) यांच्या नाशिक जिल्ह्यात (Nashik) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेतकऱ्यांवर महिलेनं गुंडगिरी केल्याचा प्रकार समोर आला आहे.  एका कृषी सेवा केंद्राच्या मालकिणीनं शेतकऱ्यांकडून उधारी वसुल करण्यासाठी चक्क गुंडांचा वापर केला आहे.  ही महिला सध्या फरार आहे. पण पोलिसांनी तिच्या एका गुंडाला गजाआड केलंय. विशेष म्हणजे ज्या महिलेकडून शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करण्यासाठी गुंडाचा वापर करतेय, त्या महिलेला कृषी मित्र पुरस्कार मिळाला आहे. (sharddha kasurde owner of Krishi Seva Kendra in nashik niphad shes use of  goons to recover loans from farmers) 

श्रद्धा कासुर्डे असं या महिलेचं नाव. नाशिकच्या निफाड तालुक्यात उगावमधील कृषी सेवा केंद्राच्या या मालकीण आहेत. यांना राज्य सरकारनं यंदाचा 'कृषी मित्र पुरस्कार' दिला आहे. मात्र तिची करणी याच्या अगदी उलट आहे. कारण कृषी सेवा केंद्रातली उधारी शेतकऱ्यांकडून वसुलीसाठी तिनं चक्क गुंडांना सुपारी दिली. हे गुंड शेतकऱ्यांना वेळी-अवेळी फोन करतात. पैशासांठी अश्लिल भाषेत शिविगाळ करून मारहाणीची धमकीही देतात.

पोलिसांकडून कारवाई

पोलिसांनी या प्रकरणी धमकी देणाऱ्या एका गुंडाला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच दमदाटी करणाऱ्याया श्रद्धा कासुर्डेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

कृषीमंत्र्यांकडून घटनेची दखल

झी 24 तासच्या या वृत्ताची दखल थेट कृषीमंत्री दादा भुसे यांनी घेतली आहे. त्यांनी या पुरस्काराबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द करण्यात आलाय. "शेतकऱ्यांना वसुलीसाठी दमदाटी करणाऱ्या महिलेवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. दमदाटी करणाऱ्या महिलेच्या कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द करण्यात आला आहे. तिला राज्य सरकारतर्फे  देण्यात आला कृषिमित्र पुरस्कार रद्द करण्यात येणार आहे", असं दादा भुसे यांनी स्पष्ट केलं.  

पूर्वी क्रेडिट कार्ड कंपन्या हीच पद्धत वापरत होत्या. मात्र कृषी केंद्र चालकही आता शेतकऱ्यांकडून उधारी वसूलीसाठी गुंडांना काँट्रॅक्ट देऊ लागले आहेत. मित्राच्या वेशात शेतकऱ्यांचा शत्रू असलेल्या भाईगिरी करणाऱ्या श्रद्धा कासुर्डेचा कृषीमित्र पुरस्कारही काढून घेण्याची मागणी पीडित शेतकऱ्यांनी केलीय. 

Read More