Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

शरद पवार यांनी मुख्यमंत्री करुन शिवसेना संपवली, या आरोपावर उद्धव ठाकरे पाहा काय म्हणाले...

Uddhav Thackeray Interview : शिवसेना काही संपलेली नाही आणि संपणार नाही. अनेकांना लालसा निर्माण झाली. त्यामुळे आताचे नाट्य घडवलं गेले आहे. सत्ता पिपासूपणा आता दिसून येत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शरद पवार यांनी मुख्यमंत्री करुन शिवसेना संपवली, या आरोपावर उद्धव ठाकरे पाहा काय म्हणाले...

मुंबई : Uddhav Thackeray Interview : शिवसेना काही संपलेली नाही आणि संपणार नाही. अनेकांना लालसा निर्माण झाली. त्यामुळे आताचे नाट्य घडवलं गेले आहे. सत्ता पिपासूपणा आता दिसून येत आहे. बरं, आधी भाजपबरोबर सत्तेत होतो तेव्हा भाजप त्रास देतोय, असं म्हणायचे. भाजप नको असे सांगणारे हेच लोक. गावागावात भाजप शिवसेनेला काम करु देत नाही. भाजप शिवसेनेला संपवतेय, असा यांचा आक्षेप होता. फुटिरांचा आता वेगळा आक्षेप दिसून येत आहे.  हे कशासाठी तर त्यांची सत्तेची लालसा दिसून येत आहे, असे  माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीच्यावेळी हे स्पष्ट केले. (शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होईल - उद्धव ठाकरे)

फक्त कारणे शोधण्याचे काम !

 एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करत शिवसेनेचे 40 आमदार फोडले. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरच शिवसेना फुटीचा आरोप करण्यात येत आहे. त्यांनीच शिवसेना संपली, असा आरोप सातत्याने करण्यात येत आहे. याबाबत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. फुटिरांचा असाही एक आक्षेप आहे की, शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करुन शिवसेना संपवली. त्यावर ते बोलत होते. बरं! झालो मुख्यमंत्री. कारण मी आता होऊन गेलेलो आहे. काय प्रॉब्लेम काय तुम्हाला? म्हणून काय तुम्ही ज्या बाळासाहेबांचा फोटो लावता, त्या बाळासाहेबांच्या पुत्राला गादीवरून खाली उतरवले? का तर म्हणे हिंदुत्व वगैरे, काँग्रेस-राष्ट्रवादी नको. ठीक आहे, पण आजच्या मुख्यमंत्र्यांची भरसभेतही नाटके पाहा. भाजप किती भयंकर म्हणून त्यांनी भरसभेत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ती क्लिप फिरतेय. भाजप कसा शिवसैनिकांवर अन्याय-अत्याचार करतो ही ती क्लिप आहे. माझ्याच समोर त्यांनी तो राजीनामा दिला होता. मी तेव्हा म्हणालो होतो, संयम ठेवा.

त्यांची लालसा वाढली एवढेच...

2019 साली भाजपने खोटेपणाचा कळस केला. ठरवलेल्या गोष्टी नाकारतोय म्हणून आपण महाविकास आघाडीला जन्म दिला. तर म्हणे, आता काँग्रेस-राष्ट्रवादीवाले त्रास देतात. मग नेमक तुम्हाला हवंय तरी काय? की फक्त कारणे शोधत आहेत. माझाही हाच प्रश्न आहे, त्यांना नक्की काय हवंय? त्यांची लालसा! स्वतःला मुख्यमंत्री पद त्यांनी अत्यंत वाईट पद्धतीने मिळवले. आता तर शिवसेनाप्रमुखांबरोबर तुलना करायला लागले की, ‘ही आमची शिवसेना’ म्हणून. अत्यंत घाणेरडा, दळभद्री प्रकार!

यांचा काही भरोसा नाय ! 

आताची परिस्थिती बघितल्यानंतर मला नाही वाटत, भाजप त्यांना कधी पुढे करील. नाही तर नंतर ते नरेंद्र भाईंशी तुलना करतील स्वतःची आणि पंतप्रधान पद मागतील. शेवटी लालसा, अशी घाणेरडी असते ना! ही चटक आहे. मला एका गोष्टीचं समाधान आहे. मी पण अडीच वर्षं मुख्यमंत्री होतो, पण मला सत्तेची चटक लागली नाही. तो सत्तापिपासूपणा रक्तात भिनला की तुम्ही कोणाचे नसता आणि कुणी तुमचं नसतं तेच त्यांचं आज झालं आहे.

आमदार गेले, आता काही खासदार गेले…

हे खासदार गेल्या निवडणुकीत पडले असते तर काय झाले असते हो? हे गेल्या निवडणुकीत पडले असते ते आता अडीच वर्षांनी पडले असे मी समजतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले. इतक्या मोठय़ा प्रमाणात आमदार फुटताहेत किंवा आपल्याला सोडून चाललेत हे चित्र जेव्हा स्पष्ट झाले तेव्हा तुमच्या मनात काय भावना होती?, असा सवाल केल्यानंतर ते म्हणाले, माझ्या मनात हेच आले की, हे सगळे… यातले अनेक जण… त्यांनी कितीही काही म्हणो. माझ्या कुटुंबाचेच घटक होते. 

मी भेटत नव्हतो! अहो, माझ्या ऑपरेशनच्या काळात मी हलू शकत नव्हतो. माझे हात-पाय हलत नव्हते. मग कसे भेटणार? इतर वेळी ‘हे’ आमच्या कुटुंबातीलच एक होते. निधी वगैरे दिला नाही म्हणाल तर त्या दिवशी तर अजित पवार यांनी सांगितलेय की, ह्यांच्या एका खात्याला बारा हजार कोटी दिले. काही ठिकाणी शेवटच्या काळात असमानता आहे, असं मला वाटलं तेव्हा काही निधीवाटपाला मी स्थगितीही दिली होती, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

विकास निधीबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित दादा, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा सुरु होती की, निधीवाटपात अशी असमानता असेल तर हा प्रश्न आपण सोडवायला हवा…आणि अधिवेशन सुरु असताना अशोकराव चव्हाण यांच्यासोबत बसून आम्ही त्यांच्या खात्याचा विषय सोडवला होता, असा दाखलाही त्यांनी दिला.

Read More