Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

संजय राऊत यांचे शायरी ट्वीट करत अमित शहा यांना प्रत्युत्तर

 शिवसेना खासदार संजय राऊत यांचे सूचक ट्विट

संजय राऊत यांचे शायरी ट्वीट करत अमित शहा यांना प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केलंय. या ट्विटमधून त्यांनी भाजपवर निशाणा साधल्याचं दिसून येतंय. काल गृहमंत्री अमित शाह सिंधुदुर्गात होते. त्यावेळी त्यांनी बाळासाहेब गेले आणि शिवसेनेनं सिद्धांत बुडवले, अशी टीका केली होती. त्यावर आता संजय राऊतांनी ट्विट करून टीका केलीय. तुफान ज्यादा हो तो, कश्तियां डूब जाती है...और घमंड ज्यादा हो तो हस्तियाँ डूब जाती है अशी शायरी त्यांनी ट्विट केलंय.

संजय राऊत यांनी राज्यसभेत भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. गेल्या सहा वर्षांपासून खोट्यालाही खरे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे असेच चालले आहे. पत्रकार राजदीप सरदेसाई, काँग्रेस नेते शशी थरुर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येतो.  जो खरं बोलतो किंवा लिहितो त्याला गद्दार, देशद्रोही संबोधलं जाते. जो सरकारला प्रश्न विचारतो, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा ठोकला जातो. पद्म पुरस्कार विजेते  राजदीप सरदेसाई, काँग्रेस नेते शशी थरूर, दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनावर लिहिणारे पत्रकार मनजीत सिंह आणि अशा अनेक लेखक, पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे संजय राऊत यांनी राज्यसभेत सांगितले. 

लाल किल्ल्यावर तिरंग्याचा अपमान झाला. मात्र, हा अपमान कोणी केला? त्याला मात्र तुम्ही पकडले का, नाही ना? असा प्रश्न संजय राऊत यांनी राज्यसभेत उपस्थित केला. प्रश्न विचारणारे सगळे देशद्रोही आहेत, मात्र देशप्रेमी कोण आहे तर अर्णब गोस्वामी, कंगना रानौत? हे देशप्रेमी आहेत का? असा प्रश्न विचारत यांना सरकारने शरण दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला. 

दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन शांततेत चालले होते. शेतकरी आंदोलनाची एकजुटता तोडण्यात सरकारला अपयश आले. हजारो शेतकरी गाझीपूर, सिंघू सीमेवर आपल्या हक्कासाठी लढत आहेत आणि या एकजुटतेमध्ये तुम्हाला देशद्रोह दिसतो. पंजाब, हरियाणाचा शेतकरी संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करत आहे.  ही केवळ लढाई त्यांचीच नाही तर देशातील शेतकऱ्याची आहे.  संपूर्ण देश त्यांच्यासोबत आहे, असे संजय राऊत यांनी राज्यसभेत ठणकावून सांगितले. 

Read More