Maharasta Politics : ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी 'हात' झटकले अन् भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांना घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेस (Maharastra Congress) आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात काँग्रेसला देखील गळती लागल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता महाविकास आघाडीतील अस्वस्थता वाढली असून बैठकांचा धडाका सुरू झाला आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अशोक चव्हाण यांना टोला लगावला आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
आपण कोण? सहा लाखाची फौज घेऊन मराठी मुलखावर चालून आलेल्या दिल्लीपती बादशहाला मातीत गाडणाऱ्यांचंच नाव साडेतीनशे वर्षांनंतरही अभिमानाने घेतलं जातं. पण, दिल्लीपुढं गुडघे टेकून कुर्नीसात करणाऱ्यांच्या आज फक्त हवेल्याच उरल्या आहेत. नावाची तर कधीच माती झालीय, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
आपण कोण?
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 13, 2024
सहा लाखाची फौज घेऊन मराठी मुलखावर चालून आलेल्या दिल्लीपती बादशहाला मातीत गाडणाऱ्यांचंच नाव साडेतीनशे वर्षांनंतरही अभिमानाने घेतलं जातं..
पण... दिल्लीपुढं गुडघे टेकून कुर्नीसात करणाऱ्यांच्या आज फक्त हवेल्याच उरल्या आहेत.
नावाची तर कधीच माती झालीय!!!
दिल्लीच्या सीमेवर येऊन ठेपलेल्या हरिणाया आणि पंजाबमधील शेतकऱ्यांवर रोखण्याचा प्रयत्न झाल्याने मोठा गोंधळ उडाला होता. तब्बल 2 वर्षांनंतर पंजाबचे शेतकरी पुन्हा एकदा दिल्लीच्या सीमेवर येऊन आंदोलन करत आहेत. त्यांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी सिंधू सीमेसह सर्व सीमावर्ती भाग सील केले आहेत. त्यावर रोहित पवारांनी संताप व्यक्त केलाय.
दरम्यान, ज्यांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसावेत तेच शेतकऱ्यांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडतायेत आणि ज्यांनी भाजपला सत्तेचा मार्ग दाखवला तेच शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे ठोकतायेत. पण लोकसभा निवडणुकीत हे वर्तुळ पूर्ण होईल आणि हाच बळीराजा सत्तांध झालेल्या मदमस्त ‘राजा’ला डोळे पुसत घरचा रस्ता दाखवेल, यात तसूभरही शंका नाही, असं म्हणत रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून भाजप सरकारला टोला लगावलाय.
अशोक चव्हाण म्हणतात...
मी जिथं राहिलो तिथं प्रामाणिकपणे काम केलं आहे. भाजपामध्ये असतानाही प्रामाणिकपणे काम करेन. माझ्या कामातूनच मी उत्तर देईन, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. आज मी माझ्या राजकीय आयुष्याची पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करत आहे, असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.