Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

शिवसेनेला एमआयएमची साथ, भाजपच्या सत्तेला अडीच वर्षात ग्रहण

सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती 

शिवसेनेला एमआयएमची साथ, भाजपच्या सत्तेला अडीच वर्षात ग्रहण

जळगाव : जळगावमध्ये सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती पहायला मिळाली. महापालिकेत २७ नगरसेवक फुटल्याने मोठा धक्का बसलेल्या भाजपाने जळगाव महापालिकेमधील सत्ता गमावली आहे. ‘एमआयएम’च्या तीन नगरसेवकांनीही शिवसेनेलाच मतदान केलं असल्याने जळगाव पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. शिवसेनेच्या जयश्री महाजन यांनी भाजपाच्या प्रतिभा कापसे यांचा पराभव करत महापौरपद मिळवलं आहे. 

भाजपा नेते गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. जळगावमध्ये सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती पहायला मिळाली असून महापालिकेत भाजपाच्या सत्तेला सुरूंग लावण्यात शिवसेनेला यश मिळालं आहे. २७ नगरसेवक फुटल्याने मोठा धक्का बसलेल्या भाजपाने जळगाव महापालिकेमधील सत्ता गमावली आहे. ‘एमआयएम’च्या तीन नगरसेवकांनीही शिवसेनेलाच मतदान केलं असल्याने जळगाव पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.

महापौर-उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री महाजन यांनी भाजपाच्या प्रतिभा कापसे यांचा पराभव करत महापौरपद मिळवलं आहे. जयश्री महाजन यांनी प्रतिभा कापसे यांचा १५ मतांनी पराभव करत महापौरपदी आपलं नाव निश्‍चित केलं. जयश्री महाजन यांना ४५ मतं मिळाली , तर प्रतिभा कापसे यांना ३० मतं मिळाली. भाजपाचे २७ नगरसेवक फुटल्याने आणि एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी देखील शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने शिवसेनेने बहुमतापेक्षाही जास्त मिळवली. उपमहापौरपदी कुलभूषण पाटील यांची निवड झाली आहे.

महापालिका निवडणुकीत भाजपने फोडाफोडीच्या राजकारणाने आपला खुंटा मजबूत केला होता. तोच कित्ता सेनेने गिरवला. जळगाव म्हणजे भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला. घरच्या धावपट्टीवर त्यांना चितपट करण्यासाठी सेनेचे खासदार विनायक राऊत, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेतला होता. भाजपच्या फुटीर नगरसेवकांसह गुलाबराव पाटील ठाण्यातील हॉटेलमध्ये थांबले होते.

महापौर, उपमहापौर निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवक फुटल्याने संकटमोचक गिरीश महाजन यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांची कोंडी झाली होती. एकूण ७५ सदस्य असणाऱ्या महापालिकेत भाजपचे ५७, शिवसेनेचे १५, एमआयएमचे तीन असे संख्याबळ होते. पण जवळपास निम्मे नगरसेवक विरोधकांना जाऊन मिळाल्याने भाजपच्या सत्तेला अडीच वर्षात ग्रहण लागलं आहे.

Read More