Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

जालनातलं मराठा आंदोलन चिघळलं, लाठीचार्ज आणि जाळपोळ... मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या घटनेचे पडसाद आता राज्यभर उमटले आहेत. मराठा संघटनेने उद्या बीड बंदचं आव्हान केलं आहे. तर या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिले आहेत. 

जालनातलं मराठा आंदोलन चिघळलं, लाठीचार्ज आणि जाळपोळ... मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Jalana Maratha Andolan : जालन्यातलं मराठा आंदोलन (Maratha Andolan) चिघळलंय. मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज (Lathicharge) केला. अंतरावली सराटी इथं हा प्रकार घडलाय. मराठा आरक्षणाच्या (Mararha Reservation) मागणीसाठी इथं आंदोलन सुरू होतं. आंदोलकांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस होता. मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील हे काही सहकाऱ्यांसह उपोषण सुरु बसले होते. या आंदोलनात अनेक गावकरी आणि संघटना सहभागी झाले होते. पण पोलिसांनी हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. आंदोलनावेळी पोलिसांनी हा लाठीचार्ज केलाय. यात काही आंदोलक आणि पोलीसही जखमी झाले आहेत. 

मराठा आंदोलन आक्रमक
मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केल्यामुळे संतप्त आंदोलकांनी गाड्यांची जाळपोळ केलीय. लाठीचार्ज घटनेचा निषेध म्हणून मराठा आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्गावर जाळपोळ केली आहे. घटनेचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. उद्या बीड बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. 

उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
गेल्या आठवड्यात मराठा आरक्षणाच्या विषयावर तज्ज्ञांशी चर्चा झाली असून त्यावर कार्यवाही सुरु आहे. फण झालेला प्रकार दुर्देवी आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी म्हटलंय. तर जालन्यातील लाठीचार्जप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) चौकशीचे आदेश दिले आहेत. जालन्यातल्या अंतरावली सराटी इथं मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केलाय. त्यानंतर याठिकाणी तणावाचं वातावरण आहे. मराठा आरक्षणासाठी गेल्या चार दिवसांपासून इथं उपोषण सुरू होतं. त्यानंतर आज आंदोलक आणि पोलीस आमने सामने आले. राज्यात या लाठीचार्जचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

विरोधकांचा सरकारवर निशाणा
इतका मोठा लाठीचार्ज गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय होऊ शकत नाही, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. हे गृहमंत्री महाराष्ट्राला लाभल्यापासून गेल्या वर्षभरात कायदा-सुव्यवस्था, लोकांची सुरक्षा यावर सतत हल्ले होत आहे. शिवसेना या घटनेचा निषेध करते असं राऊत यांनी म्हटलंय. मोदींच्या राज्यात आणि महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या राज्यात मोर्चे, आंदोलनं ही हत्यारं जे वापरतील त्यांच्यावर पोलिसांच्या माध्यमातून हल्ले करायचे अशा प्रकारचं धोरण दिसंतय. या रक्तचा प्रत्येक थेंब हा वणव्यासारखा पेटल्याशिवाय राहाणार नाही असं राऊत यांनी म्हटलंय. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. तुमचं  वैफल्य तुम्ही जनतेवर काढू नका अशी माझी त्यांना हात जोडून विनंती आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

तर हवेत गोळीबार करुन आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय... लाठीचार्ज करणा-या पोलीस अधिका-यांची चौकशी करण्याची मागणीही वडेट्टीवारांनी केलीय... तसंच लाठीचार्ज करणारं निर्दयी सरकार असल्याचीही टीकाही वडेट्टीवारांनी केलीय. जालन्यात एवढा राडा झाला तेव्हा गृहमंत्रालय झोपलं होतं का, असा सवाल सुप्रिया सुळेंनी केलाय. गरज पडल्यास शरद पवार जालन्याला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हे गृहमंत्र्यांचं अपयश असल्याचं त्या म्हणाल्या.

विनोद पाटील यांचा सवाल
मराठा आरक्षणाबद्दल राज्य सरकारनं काय पावलं उचलली, असा सवाल मराठा आरक्षण समन्वयक विनोद पाटील यांनी केलाय. लाठ्याकाठ्यांची भाषा बंद करावी, असंही त्यांनी म्हटलंय. 

Read More