Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

मकरसंक्रांतीचा गोडवा कुंभारांच्या घरातही पोहचवा...

आयुष्यात गोडवा आणणारा सण म्हणजे मकर संक्रांत... 

मकरसंक्रांतीचा गोडवा कुंभारांच्या घरातही पोहचवा...

हेमंत चापुडे, झी २४ तास, शिरूर : शिरूर तालुक्यातील कुंभारवाड्यात लगबग सुरु होते. मात्र, ज्या प्रमाणात महागाई वाढते त्या तुलनेत सुगडीला भाव नसल्यानं संक्रांत आली तरी कुंभारांच्या आयुष्यात गोडवा मात्र नाही.

संक्रांत आली की कुंभारवाड्यात सुगडी तयार करण्याची लगबग सुरु होते... शेतातून माती आणली जाते. ती चाळून पाण्यात भिजवली जाते त्यानंतर पायाने तुडवून चक्रावर सुगड्या बनवल्या जातात. कुंभार कुटुंबातील प्रत्येक सदस्य या कामात मदत करतो.

संक्रांतीच्या दिवसांत सुगड्यांना भरपूर मागणी असते. त्यामुळे दिवाळीनंतर वर्षातला हा एकच सण कुंभारांच्या आयुष्यात गोडवा आणतो. मात्र, ज्या प्रमाणात महागाई वाढताना दिसतेय त्या प्रमाणात सुगड्यांची किंमत मात्र वाढत नाही, अशी खंत शिवाजी कुंभार या कारागिरानं व्यक्त केलीय. शिवाजी यांचा मातीची भांडी बनवण्याचा व्यवसाय आहे.

आयुष्यात गोडवा आणणारा सण म्हणजे मकर संक्रांत... मात्र, याच सणासाठी मेहनत घेणारा कुंभार समाज मात्र आजही कष्टाच्या विळख्यातच अडकलाय. त्याच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळाल्यास त्याच्याही संसारात गोडवा येईल. 

त्यामुळे, मकरसंक्रांतीचा सण जोषात साजरा करण्याचा तुमचाही प्लान असेल तर या सणाचा गोडवा या कुंभार बांधवांच्या घरीही पोहचेल, याची काळजी घ्या... 

Read More