Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

कल्याणमध्ये मतदानानंतर ३२३ ईव्हीएम तब्बल २३ तास गायब

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्य मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा डॉक्टर श्रीकांत शिंदे या मतदार संघातून निवडणूक लढत आहे

कल्याणमध्ये मतदानानंतर ३२३ ईव्हीएम तब्बल २३ तास गायब

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईनजिक कल्याण लोकसभा निवडणूक मतदार संघात सोमवारी मतदान कोणत्याही गालबोटाशिवाय पार पडलं. परंतु, मतदानानंतर मात्र या लोकसभा मतदार संघातील ३२३ ईव्हीएम मशीन तब्बल २३ तास बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय. सोमवारी रात्री उशिरा ही गोष्ट लक्षात आली. या भागात झालेले मतदानाचा हिशोब करताना तब्बल ३२३ ईव्हीएम मशीन गायब असल्याचं समोर आल्यानंतर एकच गोंधळ उडाला.

कल्याण लोकसभा मतदारसंघात सोमवारी झालेल्या मतदानानंतर सर्व ईव्हीएम आणि संबंधित सामान डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले चित्रपटगृहाच्या स्ट्राँग रुममध्ये त्याच रात्री पोहचणं अपेक्षित होतं. परंतु, असं घडलं नाही. यावर शिवसेनेनं आक्षेप घेतलाय. 

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्य मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा डॉक्टर श्रीकांत शिंदे या मतदार संघातून निवडणूक लढत आहे. ईव्हीएम गायब कसे आणि कुठे झाले होते? असा प्रश्न विचारत शिवसेना नेते निवडणूक अधिकाऱ्यांसमोर दाखल झाले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांनी मीडियाशी बोलताना, आयोगाचे प्रतिनिधी आपल्याला योग्य सूचना देत नव्हते, असं म्हटलंय. 

तब्बल २३ तासानंतर ३२३ ईव्हीएम सुरक्षित निश्चित जागेवर दाखल झाले आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या जीवात जीव आला. सर्व ईव्हीएम त्याच जागेवर होती जिथे ती तैनात करण्यात आली होती, असं स्पष्टीकरण निवडणूक अधिकारी शिवाजी कादबने यांनी दिलीय. राजकीय पक्षांना मात्र निवडणूक अधिकाऱ्यांचं हे स्पष्टीकरण पटलेलं दिसत नाही.

प्रक्रियेत उशीर झाल्यानं ही ईव्हीएम मशीन स्ट्राँग रुममध्ये जमा केली जाऊ शकली नाहीत. तब्बल २३ तास गायब असलेले ईव्हीएम मशीन इथला चर्चेचा विषय ठरलाय. 

Read More