Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

तुझ्या नवऱ्याला संपवतो... आईला धमकी दिली अन्...क्षुल्लक कारणावरुन मुलाने केली वडिलांची हत्या

Kolhapur Crime : कोल्हापुरच्या चंदगड तालुक्यात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे.

तुझ्या नवऱ्याला संपवतो... आईला धमकी दिली अन्...क्षुल्लक कारणावरुन मुलाने केली वडिलांची हत्या

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : वडिलांची हत्या करुन तरुणाने स्वतःलाही संपल्याची धक्कादायक घटना कोल्हापूच्या (Kolhapur Crime) चंदगड तालुक्यात घडली आहे. दारुच्या नशेत तरुण मुलाने आपल्या जन्मदात्याची निर्घृणपणे हत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच चंदगड पोलिसांनी (Kolhapur Police) घटनास्थळी धाव घेतली आहे. या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

कोल्हापुरच्या चंदगड तालुक्यातील देसाईवाडीमध्ये हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. मनोहर अप्पाजी गावडे (58) असे वडिलांचे नाव आहे. तर सागर मनोहर गावडे असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. मृत वडील मनोहर गावडे हे चंदगड तालुक्यातील देसाईवाडी इथं आपल्या कुटुंबियासोबत राहत होते. तर मनोहर यांचा मुलगा सागर गावडे याला दारुचे व्यसन होते. यामुळे त्याचे वारंवार सागर आणि मनोहर गावडे यांच्यात वाद होत होता. अनेकवेळा आई मीनाक्षी गावडे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र सागर कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
 
सागर हा पूर्णपणे दारूच्या आहारी गेल्यामुळे त्याचे वडिलांसोबत वारंवार वाद व्हायचे. या वादातून घरामध्ये पिता-पुत्रांमध्ये जोरदार भांडणे देखील झाली होती. दारूच्या व्यसनापोटी वाद होत असताना देखील सागर दारू सोडायला तयार नव्हता. त्यामुळे या दोघांचे वाद मिटवण्याचा प्रयत्न मीनाक्षी यांनी अनेक वेळेला केला. पण तरीदेखील त्यांना यश आलं नव्हतं.

रविवारी रात्री सागरची आई मीनाक्षी गावडे या त्यांच्या नातेवाईकांकडे बारश्याच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. या कार्यक्रमाच्या वेळी सागर हा तिथे दारू पिऊन गेला आला आणि त्याने आईलाच तुझ्या नवऱ्याला संपवतो अशी धमकी दिली. यानंतर सागरने थेट घर गाठलं. वडील मनोहर गावडे हे घरी असल्याचे दिसताच सागरला राग अनावर झाला. यावेळी घरी कोणीही नव्हते. त्यामुळे घरी पोहोचताच त्यांच्यात पुन्हा वाद सुरु झाला. रागाच्या भरात सागरने सागरने त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले. त्यानंतर रागाच्या भरात वडिलांचा गळा आवळून खून केला. वडिलांची हत्या केल्यानंतर सागरने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली.आपण केलेल्या कृत्याचा त्याला पश्चाताप झाल्याने सागरने स्वतःला देखील संपवले. धक्कादायक बाब म्हणजे मनोहर गावडे यांना देखील दारूचे व्यसन होते. त्यामुळे दारुने अख्ख कुटुंब उध्वस्त केल्याचे समोर आलं आहे.

Read More