हिंगणघाट : हिंगणघाटमधल्या शिक्षिकेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. पीडितेच्या वडीलांशी बोलून त्यांचे सांत्वन केल्याचे देशमुख म्हणाले. तसेच पीडितेच्या भावाला राज्य शासनामध्ये नोकरी देण्याचे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.
हिंगणघाटच्या घटनेच्या खटला जलदगती न्यायालयात चालवणार असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली. तसेच विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची भेट घेऊन त्यांना हा खटला चालवण्याबाबत निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी सांगितले.
ही महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी घटना असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. हिंगणघाट जळीतकांडातल्या पीडितेच्या मृत्यूनंतर सरकारनं कडक कायदा करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा केल्याची माहिती अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिकांनी दिलीय. तर कठोर कायद्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनीही सांगितलंय.
हिंगणघाट प्रकरणातल्या निरपराध मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.तिला भावपूर्ण श्रद्धांजली!
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 10, 2020
ही घटना महाराष्ट्राच्या मातीसाठी अतिशय लाजीरवाणी आहे.अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकार अधिक संवेदनशीलपणे गुन्हेगारांविरूद्ध कठोर कारवाई करेल.मी तिच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
हिंगणघाट प्रकरणी दोषीला फाशी देण्यासाठी सरकारनं प्रयत्न करावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीय. एक समिती नेमून धोरण ठरवण्याचंही त्यांनी म्हटलंय.