Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

शपथ घेतलेल्या राष्ट्रवादीच्या 9 आमदारांना पहिला मोठा झटका! जयंत पाटील यांनी केली शिस्तभंगाची कारवाई

मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या  9 आमदारांना शिस्तभंगाची नोटीस बजावण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडून कारवाईच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. 

शपथ घेतलेल्या राष्ट्रवादीच्या 9 आमदारांना पहिला मोठा झटका! जयंत पाटील यांनी केली शिस्तभंगाची कारवाई

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाल्यानंतर लक्षेवधी घडामोडी घडत आहेत.  2 जुलै रोजी अजित पवार यांच्यासह 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. यामुळे राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. शपथ घेतलेल्या राष्ट्रवादीच्या 9 आमदारांना पहिला मोठा झटका बसला आहे. शपथ घेतलेल्या 9 आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही कारवाई केली आहे. 

शपथ घेतलेल्या 9 आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आलीय.  राष्ट्रवादीच्या ज्या नऊ आमदारांनी शपथ घेतली, त्यांच्यावर शिस्तभंग कारवाई करण्यात आलीय.  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही कारवाई केलीय. उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, हसन मुश्रीफ, धर्मराव आत्राम, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. 

2 जुलैला नेमकं काय घडलं

2 जुलैला महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राजभवनावर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या बंडामुळे शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभ फूट पडली. राष्ट्रवादीच्या 54 आमदारांपैकी 30 आमदार अजित पवारांसह राजभवनात दाखल झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अजित पवारांनी शपथ घेतली. एकाच टर्ममध्ये अजित पवार तिस-यांदा उपमुख्यमंत्री बनलेत. अजित पवारांसोबतच छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, अदिती तटकरे यांनीही शपथ घेतली.

राज्यातील सरकारला राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही अस राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. ज्या 9 जणांनी शपथ घेतली त्यांना कायदेशीर अडचणींना तोंड द्यावं लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. सरकारला पाठिंबा देण्याच्या पत्रावर सह्या करताना राष्ट्रवादी आमदार संभ्रमात होते. येत्या 5 जुलैला पवार त्यांच्याशी चर्चा करणार आहेत, असं त्यांनी सांगितलं. भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

तर, दुसरीकडे संख्याबळ जमवण्यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची रस्सीखेच सुरु आहे. सुप्रिया सुळे, अजित पवारांकडून आमदारांना फोनाफोनी सुरु आहे.  राष्ट्रवादीने पदाधिका-यांकडे प्रतिज्ञापत्र मागवली  आहेत. 

3 महिन्यांत राज्याचं चित्र बदलेल; शरद पवार यांचा इशारा

आपल्याला तरुणांचा प्रचंड पाठिंबा मिळतोय, त्यांना योग्य दिशा दिली तर ३ महिन्यांत राज्याचं चित्र बदलेल, असं पवारांनी म्हटलंय. त्याचबरोबर अजित पवार म्हणजे पक्ष नव्हे, असंही पवारांनी साता-यातल्या पत्रकार परिषदेत म्हटलं. तसंच काँग्रेसची विरोधी पक्षनेत्याची मागणी रास्त असल्याचंही ते म्हणाले. 

Read More