Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

आयुष्याचा शेवटही एकत्रच केला; फोन येताच पोलिस धावत घरी गेले पण तोपर्यंत सगळ संपलं होतं

जळगाव येथे वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या दाम्पत्याने पोलिसांना फोन केला होता. 

आयुष्याचा शेवटही एकत्रच केला; फोन येताच पोलिस धावत घरी गेले पण तोपर्यंत सगळ संपलं होतं

वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : आयुष्यभर एकमेकांची सोबत देणाऱ्या वृद्ध जोडप्याने आयुष्याचा शेवटही एकत्रच केला आहे. वृद्ध दाम्पत्याने पोलिसांना फोन करत, आपण आत्महत्या करत असल्याची पूर्वकल्पना देत विषारी औषध प्राशन करत जीवनयात्रा संपविली. जळगावमधील पाचोरा तालुक्यातील लोहटार येथे ही  हृदयद्रावक घटना घडली आहे. पोलिसांनी तात्काळ त्यांच्या घरी जाऊन दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

काय आहे नेमका प्रकार?

पाचोरा तालुक्यातील लोहटार या गावात एसटी महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी ईश्वर नामदेव पाटील वय 78 वर्षे आणि प्रमिलाबाई ईश्वर पाटील वय 72 वर्षे हे दाम्पत्य राहत होते. ईश्वर पाटील यांनी पहाटे 4 च्या सुमारास पाचोरा पोलिसांना फोन केला, ''मी आणि माझी पत्नी या संसाराला कंटाळून आत्महत्या करत आहोत. आमच्या आत्महत्येला कोणासही कारणीभूत धरू नये'', असे सांगून फोन ठेवला.

पोलिसांनी तत्काळ लोहटार येथे धाव घेत ईश्वर पाटील यांचे घर गाठले. यावेळी ईश्वर पाटील व प्रमिलाबाई पाटील यांनी विषारी औषध प्राशन केल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी त्यांना तातडीने पाचोरा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान प्रमिलाबाई पाटील आणि ईश्वर पाटील यांचे निधन झाले. या प्रकरणी पाचोरा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी दिली आहे.

मारहाण करून तरुणाचे अपहरण करण्याचा प्रयत्न

माजलगाव येथील युवकास मारहाण करून अपहरण करण्याचा प्रयत्न केला आहे. माजलगाव पोलिसांच्या सतर्कतेने गढी टोलवर अपहरणकर्त्यांना पकडले. माजलगाव शहर पोलिसात चौघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.  पैशाच्या वादातुन शहरातील शाहु नगर भागात राहणा-या युवकाचे अपहरण करून जिवे मारण्याच्या प्रयत्नात अपहरण होण्याच्या काही काळात मित्रांनी पोलिसांना माहिती दिल्याने युवकाचा जीव वाचला आहे. 

क्षुल्लक कारणावरून एका युवकाची हत्या 

नांदेड मधील सिडको भागात शुक्रवारी रात्री हत्या झाली होती. या घटनेच्या निषेधार्थ आज सिडको आणि हडको मध्ये कडकडीत बंद ठेवण्यात आला होता. दुचाकीला कट मारल्या वरुन कारणावरून अवधूत गिरडे या 20 वर्षीय युवकाचा खून करण्यात आला होता. शुक्रवारी रात्री सिडको येथील पाण्याच्या टॉकीजवळ ही घटना घडली होती. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केलाहय. खूण करणाऱ्या चारही आरोपींना पोलीसांनी अटक केली असून आरोपींमध्ये 2 आरोपी अल्पवयीन आहेत. नांदेड शहरात खुनाच्या घटना वाढल्याने पोलिसांचा वचक कमी झाल्याची ओरड जनतेतून होत आहे.

 

Read More