Marathi News> भारत
Advertisement

लष्करप्रमुखांनी सांगितला नव्या कारकिर्दीतील महत्त्वाचा बेत

पाहा ते नेमकं कोणत्या गोष्टीला देणार प्राधान्य 

लष्करप्रमुखांनी सांगितला नव्या कारकिर्दीतील महत्त्वाचा बेत

नवी दिल्ली : भारतीय सैन्यदल सेवेत नव्याने लष्करप्रमुख या पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर  army chief General Manoj Mukund Naravane मनोज मुकूंद नरवणे यांनी येत्या काळात त्यांच्या कारकिर्दीमध्ये कोणत्या गोष्टींवर भर दिला जाणार आहे याचा उलगडा केला. बुधवारी त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट दिली. देशवासियांना त्यांनी नव्या वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या. माध्यमांशी संवाद साधतेवेळी त्यांनी आपल्या कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रत्येक क्षणी तयार राहण्यालाच आपलं प्राधान्य असणार आहे, असं ते म्हणाले. 

मानवाधिकारांचा आदर करण्यावर आपलं विशेष लक्ष असेल, असंही ते म्हणाले. 'मी वाहेगुरुंचरणी प्रार्थना करतो की लष्करप्रमुख म्हणून मिळालेली जबाबदारी पार पाडण्यासाठी मला धैर्य आणि सामर्थ्य द्या. देशाच्या सैन्यदलातील तिन्ही तुकड्या या देशसंरक्षणार्थ तत्पर आहेत', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

वाचा : तीन 'बॅचमेट' सांभाळणार देशाच्या संरक्षणाची धुरा

मंगळवारी जनरल नरवणे यांनी भारतीय लष्कराच्या प्रमुखपदाची सुत्र हाती घेतली. जनरल बिपीन रावत यांच्या निवृत्तीनंतर त्यांना ही जबाबदारी देण्यात आली. तर, रावत यांची नियुक्ती देशाच्या पहिल्या सैन्यदलप्रमुखपदी करण्यात आली. 
चायना एक्स्पर्ट म्हणून लष्करप्रमुख नरवणे  यांची सैन्यात ओळख आहे. शिवाय जम्मू काश्मीरमधील काही कारवायांचाही त्यांना तगडा अनुभव आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांच्याकडून घेण्यात येणारे निर्णय, महत्त्वपूर्ण कारवाया या साऱ्यावरच अनेकांचं लक्ष असेल. 

दरम्यान, यापूर्वी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यावर वक्तव्य केलं. आपल्या शेजारी राष्ट्राकडून दहशतवादाच्या माध्यमातून छुपं युद्ध लढलं जात आहे. शिवाय नियंत्रण रेषेवर वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघनही केलं जात आहे, ही वस्तुस्थिती त्यांनी समोर ठेवली. सीमारेषेपलीकडे असणारे दहशतवादी तळ पाहता त्यांच्याकडून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्मात असले तरीही अशा प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यास भारतीय सैन्यदलाचे जवान सज्ज असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

Read More