Marathi News> भारत
Advertisement

राजीनाम्यानंतर राष्ट्रगीतापूर्वीच येडियुरप्पांनी सदन सोडलं - राहुल गांधी

 पण, आज पंतप्रधान हे जनता, सुप्रीम कोर्ट आणि लोकशाहीपेक्षा मोठे नाहीत हे दिसून आलं....

राजीनाम्यानंतर राष्ट्रगीतापूर्वीच येडियुरप्पांनी सदन सोडलं - राहुल गांधी

नवी दिल्ली  : राजीनाम्यानंतर राष्ट्रगीत सुरू असताना येडियुरप्पा आणि भाजप नेते विधानसभेतून बाहेर पडलेले तुम्ही पाहिलंच असेल... याच प्रवृत्तीविरुद्ध आम्ही भांडतोय, असं म्हणत राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केलीय. भाजपला आणि आरएसएसला यातून धडा मिळालाय, असंही त्यांनी म्हटलंय. 

भाजपनं कर्नाटक, गोवा आणि मणिपूरमध्ये जनादेशाचा अपमान केला. पण, आज पंतप्रधान हे जनता, सुप्रीम कोर्ट आणि लोकशाहीपेक्षा मोठे नाहीत हे दिसून आलं.... भ्रष्टाचाराविरुद्ध लढत असल्याचा दावा करणाऱ्या मोदींचा या निमित्तानं पर्दाफाश झालाय. खुलेआम भाजपच्या नेत्यांनी काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न केला. 

देशाच्या न्यायव्यवस्थेशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप आणि आरएसएसला आम्ही लढा देणार आणि त्यांना रोखणार, असंही राहुल गांधी यांनी यावेळी म्हटलंय. 

येडियुरप्पांचा राजीनामा 

गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेल्या संत्ता संघर्षानंतर भाजपचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी फ्लोर टेस्ट आधीच राजीनामा दिला आहे. येदियुरप्पा यांनी आपल्या भाषणात पुढच्या रणनीतीचा उल्लेख केला. त्यानंतर ते राज्यपालांकडे राजीनामा देण्यासाठी निघून गेले. मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनी विरोधी पक्षावर आरोप केला आणि बहुमत सिद्ध करण्याआधीच सत्ता सोडली. त्यांनी म्हटलं की, जनतेने आम्हाला ११३ जागा दिल्या असत्या तर चित्र काही वेगळं राहिलं असतं. राज्यात प्रामाणिक नेत्यांची गरज आहे. आज माझी अग्निपरीक्षा आहे. मी पुन्हा जिंकून येईन. आम्ही १५० हून अधिक जागा निवडून आणू... राज्यातील प्रत्येक क्षेत्रात जाऊ आणि जिंकून येऊ... राज्यात लवकरच निवडणुका होतील, असंही त्यांनी म्हटलंय.  

Read More