Marathi News> भारत
Advertisement

'...तर मी पंतप्रधानांना कधीच तुरुंगात धाडले असते'

या भाषणाची क्लीप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'...तर मी पंतप्रधानांना कधीच तुरुंगात धाडले असते'

श्रीनगर: माझ्या हातात सत्ता असती तर मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कधीच धाडले असते, असे विधान नॅशनल कॉन्फरन्सचे नेते जावेद अहमद राणा यांनी केले. ते बुधवारी पुंछ येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जावेद राणा यांनी म्हटले की, अल्लाहची शपथ घेऊन सांगतो, माझ्या हातात असते तर मी पंतप्रधानांना कधीच तुरुंगात धाडले असते. काश्मीर आणि देशभरात जितक्या हत्या झाल्या त्या सर्वांचे गुन्हे त्यांच्यावर दाखल केले असते, असे जावेद राणा यांनी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खूनी आहेत. ते देशातील एकतेचे शत्रू आहेत. त्यांनी हिंदू-मुस्लिमांची परंपरा संपवली आहे. यासाठी प्रसारमध्यमेही तितकीच जबाबदार आहेत. त्यामुळे माझ्या हातात सत्ता असती तर मी त्यांना तुरुंगात धाडले असते, असेही राणा यांनी सांगितले. या भाषणाची क्लीप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर परस्परविरोधी प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

काही दिवसांपूर्वीच नॅशनल कॉन्फरन्सचे नेते अकबर लोन यांनी पाकिस्तानविषयी सहानुभूती व्यक्त करत वाद ओढवून घेतला होता. माझ्या सीमारेषेपल्याडचा मुसलमान देश (पाकिस्तान) समृद्ध राहू दे, यशस्वी होऊ दे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात मैत्री असावी. त्या मैत्रीचा मी समर्थक आहे. पाकिस्तानला कोणी एक शिवी दिली तर मी त्यांना दहा शिव्या देईन, असे अकबर लोन यांनी सांगितले होते.

Read More