Marathi News> भारत
Advertisement

'या' मोबाईल कंपनीने अनिल अंबांनीविरुद्ध ठोकला दावा; अटक करण्याची मागणी

अंबानी यांनी न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला.

'या' मोबाईल कंपनीने अनिल अंबांनीविरुद्ध ठोकला दावा; अटक करण्याची मागणी

नवी दिल्ली: सध्या राफेल विमान खरेदी व्यवहारातील कथित घोटाळ्यामुळे चर्चेत असलेले उद्योगपती अनिल अंबांनी यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. मोबाईल फोनचे उत्पादन करणाऱ्या एरिक्सन या कंपनीने पैसे थकवल्यामुळे अनिल अंबानी यांच्याविरुद्ध कायदेशीर याचिका दाखल केली आहे. अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशनने तब्बल ५५० कोटी रुपये थकवल्याचे एरिक्सनने याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे अनिल अंबानी यांना परदेशात जाण्यावर बंदी घालावी. तसेच पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यावे, अशी मागणी एरिक्सन कंपनीने केली आहे. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अनिल अंबानी यांनी स्पेक्ट्रम वाटपाच्या मुद्द्यावरून दूरसंचार विभागाविरोधात याचिका दाखल केली आहे. स्पेक्ट्रम लिलावात झालेल्या विलंबामुळे आपल्याला एरिक्सन आणि इतर कंपन्यांची देणी देण्यास उशीर झाला, असे अंबानी यांचे म्हणणे आहे. 

अनिल अंबानी यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या

'इकॉनॉमिक टाईम्स'च्या वृत्तानुसार, रिलायन्स कम्युनिकेशन बऱ्याच काळापासून पैसे देण्यास टाळाटाळ करत आहे. अनिल अंबानी यांनी काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात एरिक्सन कंपनीचे ५५० कोटी रुपये देण्याची वैयक्तिकरित्या हमी दिली होती. मात्र, त्यानंतर अंबानी यांनी न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला. न्यायालयाचा अवमान झाल्याची बाब सिद्ध झाल्यास अनिल अंबानी यांना सहा महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो. येत्या सोमवारी म्हणजे ७ जानेवारील या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. 

अनिल अंबानी म्हणतात, अडचणीच्या काळात लोक माझा फोनसुद्धा घेत नव्हते

यापूर्वी न्यायालयाने रिलायन्स कम्युनिकेशनला पैसे चुकते करण्यासाठी ३० डिसेंबरची अंतिम मुदत दिली होती. मात्र, त्यामध्ये रिलायन्स कम्युनिकेशनला अपयश आले. यानंतर एरिक्सनने व्याजासहित पैसे परत करण्याची मागणी केली होती.

Read More