नवी दिल्ली : हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर (Hathras Case) आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Yogi Adityanath ) यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा ( Priyanka Gandhi-Vadra ) यांनी केली आहे. हाथरसचा जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यातल्या फोन कॉल्सचा रेकॉर्ड जाहीर करावा, अशीही मागणी प्रियंका यांनी यावेळी केली.
हाथरसचे पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक आणि अन्य पोलीस अधिकाऱ्यांना निलंबीत केल्यावर प्रियंका यांनी ट्विट करून आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आदित्यनाथ यांनी आपली जबाबदारी झटकू नये, असे त्यांनी म्हटले आहे.
.@myogiadityanath जी कुछ मोहरों को सस्पेंड करने से क्या होगा? हाथरस की पीड़िता, उसके परिवार को भीषण कष्ट किसके ऑर्डर पर दिया गया? हाथरस के डीएम, एसपी के फोन रिकार्ड्स पब्लिक किए जाएँ। मुख्यमंत्रीज अपनी जिम्मेदारी से हटने की कोशिश न करें। देश देख रहा है @myogiadityanath इस्तीफा दो
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 2, 2020
हाथरस घटनेनंतर देशात तीव्र संताप व्यक्त होत आहे. जंतरमंतरवर हाथरस प्रकरणी मोठ्या प्रमाणात काल आंदोलने झाली. शेकडो सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, महिला आणि नेते मंडळी या आंदोलनात उतरले होते. पीडित मुलीसाठी आयोजिक प्रार्थना सभेत प्रियंका गांधी-वाड्रा सहभागी झाल्या. हाथरसमधील पीडित मुलीला न्याय मिळावा म्हणून देशभरातल्या प्रत्येक महिलेने आवाज उचलला पाहिजे, असे त्या म्हणाल्या. या प्रकऱणी न्याय मिळत नाही तोवर काँग्रेस पार्टी योगी आदित्यनाथ सरकारवर दबाव कायम ठेवेल असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, लखनऊमध्ये काँग्रेसने वाल्मिकी मंदिर घंटा घर इथे प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. या प्रार्थनासभेला मोठी गर्दी होती. हाथरस प्रकरणातील आरोपींना तातडीने फाशीची शिक्षा व्हावी तसेच या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
युवक काँग्रेसच्यावतीने नवी दिल्लीत हाथरसप्रकरणी न्याय देण्याची मागणी करत मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला. युवक काँग्रेसच्या रायसीना रोडवरील मुख्यालयापासून सुरू झालेला हा मोर्चा जंतरमंतरपर्यंत काढण्यात आला. योगी आदित्यनाथ सरकार पीडितांवर अन्याय करत असल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे.
मैं यूपी के मुख्यमंत्री जी से कुछ सवाल पूछना चाहती हूँ-
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) September 30, 2020
परिजनों से जबरदस्ती छीन कर पीड़िता के शव को जलवा देने का आदेश किसने दिया?
पिछले 14 दिन से कहां सोए हुए थे आप? क्यों हरकत में नहीं आए?
और कब तक चलेगा ये सब? कैसे मुख्यमंत्री हैं आप? pic.twitter.com/Q2qPcDXDTT
हाथरस प्रकरणानंतर उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारही निशाण्यावर आले आहे. दरम्यान, पीडितेच्या मृत्यूनंतर हाथरसमधील परिस्थितत तणावाची भर पडली आहे. हाथरस मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi Vadra ) यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. तसा त्यांनी प्रवासही सुरु केला. पण, त्यापूर्वीच उत्तर प्रदेश पोलिसांकडून कारवाई करत राहुल आणि प्रियंका यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना भेटू दिले नाही. त्यानंतर तीन- चार तासांनी त्यांची सुटका करण्यात आली. दरम्यान, पायी निघालेल्या राहुल गांधी यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली होती. त्यानंतर काँग्रेसकडून योगी सरकारचा तीव्र निषेध व्यक्त करत देशभरात आंदोलन केले.
काँग्रेस नेते आणि काँग्रेस समर्थकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. पोलिसांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी पायी निघालं असतानाच राहुल गांधी यांना पोलिसांनी अडवलं, ज्यावेळी आपल्याला पोलिसांनी खाली पाडल्याचंही राहुल गांधी यांनी सांगितलं. फक्त मोदीच या देशात पायी चालू शकतात का? सर्वसामान्य व्यक्तीला ही परवानगी नाही का? वाहन थांबवल्यामुळंट आम्ही पायी निघालो होतो, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
१४ सप्टेंबर २०२० रोजी आपल्या भावा सोबत पीडिता आपल्या शेतात गेली होती. याठिकाणी चार तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रक्तबंबाळ अवस्थेत जेव्हा ही तरुणी घटनास्थळी आढळून आली, तेव्हा तिची जीभ छाटलेली होती तसेच तिच्या मानेवर गंभीर जखमा होत्या. तिचा पाठिचा कणाही मोडण्यात आला.