Marathi News> भारत
Advertisement

Bihar Train Accident : नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस अपघातात चौघांचा मृत्यू; घटनास्थळाचा हादवणारा व्हिडीओ समोर

Train Derailed In Buxar: रेल्वे अपघातांचं सत्र काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. कारण, बिहारमधील  बक्सर (Buxar) येथे  नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस ट्रेन (North East Express Train) चे डबे घसरले आहेत.   

Bihar Train Accident : नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस अपघातात चौघांचा मृत्यू; घटनास्थळाचा हादवणारा व्हिडीओ समोर

North-East Express Derailed: भारतीय रेल्वेमधील अपघातांचं सत्र नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु असतानाच पुन्हा एकदा रेल्वे विभागाला हादरवणारी एक भयानक घटना नुकतीच बिहारमधील (Bihar) बक्सर (Buxar) येथे घडली. बक्सर जिल्ह्यातील रघुनाथपुर जंक्शन येथे नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस ट्रेन (North East Express Train)चे 21 डबे रुळावरून घसरले. अतिशय भीषण स्वरुपाच्या या अपघातामध्ये आतापर्यंत 4 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, 100 प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचं सांगिलं जात आहे. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि स्थानिक बचाव पथकानं घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीनं नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं. 

माहितीनुसार, दानापुर-बक्सर ट्रॅकवर येणाऱ्या रघुनाथपूर रेल्वे स्थानकापाशी बुधवारी रात्री 12506 डाउन नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस रुळावरून घसरली. सध्याच्या घडीला या घटनेतील मृतांचा आकडा कमी असला तरीही येत्या काही वेळात तो वाढू शकतो अशी भीती प्रत्यक्षदर्शींकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

हेसुद्धा वाचा : Weather Update : पावसाळ्यानंतर हिवाळा सुरु होणारे की उन्हाळा? राज्यातील तापमानवाढ पाहून सर्वांनाच पडला प्रश्न 

एएनआय या वृत्तसंस्थेनं नुकताच घटनास्थळाचा एक व्हिडीओसुद्धा शेअर केला. जिथं रेल्वे रुळावरून नेमकी कशी आणि कुठं घसरली, घटनेनंतर तिथं नेमकी काय परिस्थिती होती याचं चित्र स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. 

SDRF चं पथक सक्रिय 

रेल्वे अपघाताची माहिती मिळताच बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही या प्रकरणात लक्ष घातलं. घटनास्थळी SDRF चं पथक सध्या बचावकार्यात मदत करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बक्सरहून निघाल्यानंतर ही रेल्वे आपल्या गतीनं पुढे जात होती. पण, रघुनाथपूर रेल्वे स्थानकानजीक पास पॉईंट बदलल्यानंतर एक मोठा झटका लागला आणि रेल्वेचा अपघात झाला. 

सदरील दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करत, रेल्वे अपघाताच्या मूळ कारणाचा शोध घेतला जाईल असं सूचक विधान केलं. तिथं या अपघातानंतर रेल्वे विभागाकडून बदनापूर, पटना आणि आरा येथे हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आले असून, 7759070004  हा क्रमांकही रेल्वे विभागानं जारी केला. 

Read More