Marathi News> हेल्थ
Advertisement

अकाली बाळ जन्मदराच्या प्रमाणात वाढ, काय आहेत कारणं?

जगात दरवर्षी दीड कोटी बालकांचा जन्म वेळेआधी होतो.

अकाली बाळ जन्मदराच्या प्रमाणात वाढ, काय आहेत कारणं?

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : जगात वेळेपूर्वीच जन्माला येणाऱ्या बालकांचं प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. अशा बालकांच्या मृत्यूचं प्रमाणही अधिक आहे. बदलत्या जीवनशैलीबरोबरच इतरही अनेक कारणांमुळे अकाली बाळ जन्मदराच्या प्रमाणात वाढ होत आहे. मिरा रोडमध्ये राहणाऱ्या इशरत नवाज यांचं बाळ जन्माला आल्यापासून म्हणजे गेल्या २ महिन्यांपासून वाडिया रूग्णालयाच्या एन आय सी यू मध्ये उपचार घेत आहे.

वजन अवघं ७०० ग्रॅम

२४ व्या आठवड्यातच म्हणजे अवघ्या साडे पाच महिन्यांतच इशरत यांच्या बाळानं जन्म घेतला. जन्मावेळी या बाळाचं वजन अवघं ७०० ग्रॅम इतकंच होतं. आता त्याचं वजन चौदाशे ग्रॅम झालं आहे. तरीही डॉक्टरांबरोबरच आईची त्याच्यावरची २४ तासांची देखरेख काही सुटलेली नाही.

जीवाला धोका 

 २४ ते ३७ आठवडे म्हणजेच साडे पाच महिने ते साडे आठ महिन्यांच्या कालावधी दरम्यान जन्मलेलं बाळ वेळेआधी जन्मलेलं बाळ म्हंटलं जातं.

जगात दरवर्षी दीड कोटी बालकांचा जन्म वेळेआधी होतो. वर्षाला यातील २० लाख बालकांचा मृत्यू होतो.

कारण ५ वर्षांपर्यंत त्यांच्या जीवाला धोका संभवत असतो. जगात वेळेआधी जन्म घेतलेल्या बालकांची सर्वाधिक संख्या भारतात असून ती  वर्षाला ३५ लाख इतकी आहे.

लहान वयात लग्न होणं, खूप उशिरा मूल जन्माला घालण्याचं नियोजन करणं, बदलती जीवनशैली, वाढते ताणतणाव, जंतुसंसर्ग, आयव्हीएफ तंत्रज्ञान, अशा विविध कारणांमुळे वेळेआधी मूल जन्माला येण्याचं प्रमाण वाढलंय.

अशी बालकं जगवण्यासाठी रुग्णालयांमधील एन आय.सी.यू ची गरज भासते. मात्र तेवढ्या प्रमाणात खास करून ग्रामीण भागात एन आय.सी.यू उपलब्ध नसल्यानं मूल दगावण्याचं प्रमाण अधिक आहे.

Read More