मुंबई: अमेरीकेत उदयास आलेल्या #Me Too चळवळीचे वारे भारतातही पसरले. अभिनेत्री तनुश्री दत्ताने जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केल्यानंतर अनेक महिलांनी #Me Too चळवळी अंतर्गत आपल्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडली. लेखिका विनता नंदा यांनी जेष्ठ अभिनेते आलोक नाथ यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप केले होते. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने आलोक नाथ यांच्या विरोधात तब्बल सहा महिने असहयोगाचे आदेश दिले आहेत. याचा अर्थ सहा महिन्यांच्या कालावधीत कोणत्याही कलाकाराने आलोक नाथ यांच्यासोबत काम न करण्याचे सक्त आदेश दिले आहेत.
विनता नंदा यांनी केलेल्या आरोपानंतर आईएफटीडीए प्रमुख अशोक पंडित यांनी हा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे. अशोक पंडित यांनी सांगितल्याप्रमाणे आईसीसी द्वारे तीन वेळा आलोक यांना बोलावण्यात आले, परंतु त्यांनी चौकशीचा भाग बनण्यास सपशेल नकार दिला. आलोक नाथ यांनी चौकशीचे सर्व आदेश फेटाळून लावत आईसीसी कडून दिलेल्या आदेशाचे उलंघन केले.