Marathi News> शिक्षण
Advertisement

अंतिम वर्षाच्या परीक्षा केंद्रावर न घेण्याचं सरकारचं मत

अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सुप्रीम कोर्टाने काल महत्त्वाचा निर्णय दिला.

अंतिम वर्षाच्या परीक्षा केंद्रावर न घेण्याचं सरकारचं मत

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सुप्रीम कोर्टाने काल महत्त्वाचा निर्णय दिला. कोरोनाच्या संकटात अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करता येणार नाहीत, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. त्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कुलगुरूंबरोबर अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा घ्यायच्या? याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. 

'प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार नाही असं कुलगुरू आणि सरकारचं मत आहे. इतर पर्यायांचा विचार करून कशी परीक्षा  घ्यायची याचा निर्णय घेतला जाईल. ओपन बूक किंवा असाईनमेन्टवर आधारित परीक्षा घेण्याचा विद्यार्थ्यांचा आग्रह आहे. विद्यार्थ्यांचे मत लक्षात घेऊन आम्ही त्या दृष्टीने विचार करतोय', अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली. 

ऑफलाइन, ऑनलाइन, नेहमी घेतो तशी, ओपन बूक, असाईनमेन्ट बेस अशा पाच पद्धतीने परीक्षा घ्या, असं युजीसीने सांगितल्याचं उदय सामंत म्हणाले. 

कोविडच्या काळात विद्यार्थ्यांना थेट परीक्षा केंद्रावर बोलवून परीक्षा घेणं आता शक्य नाही. अनेक कुलगुरूंनी हे मत मांडलं. विद्यार्थ्यांना त्रास न होता सोप्या पद्धतीने कशी परीक्षा घेता येईल, याचा अहवाल देण्यासाठी एक समिती नेमली आहे, मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली जाईल, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. 

परीक्षा कशी घ्यायची, यासाठी नेमलेली समिती सोमवारी आपला पहिल्या मुद्द्याचा अहवाल देईल. यात ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेता येईल का? हा मुद्दा असेल. त्यानंतर परीक्षा कशी घ्यायची याबाबत समिती इतर कुलगुरूंशी आणि विद्यार्थ्यांशी चर्चा करतील. बॅकलॉग, अंतिम वर्ष, तंत्र विद्यापीठ यांच्या परीक्षा कशा घ्यायच्या, याचा अहवाल समिती देईल, असं उदय सामंत म्हणाले. 

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येणार नाही, तसंच सोप्यात सोपी परीक्षा घेतली जाईल, अशी ग्वाही उदय सामंत यांनी दिली, तसंच ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेता येणार नाही, असं अनेक कुलगुरूंचं मत असल्याचंही सामंत यांनी सांगितलं. 

Read More